“फसवी कर्जमाफी देऊन बळीराजाची थट्टा करू नका!” कर्जमुक्तीसाठी दौंड-अहिल्यानगर महामार्गावर शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’ एल्गार!
श्रीगोंदा (अहिल्यानगर) प्रतिनिधी, १९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
श्रीगोंदा: “राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही संपूर्णपणे फसवी असून, याद्वारे कष्टाळू शेतकऱ्यांची घोर फसवणूक आणि क्रूर चेष्टा करण्याचे काम सुरू आहे. अटी व शर्तींच्या जाळ्यात अडकवून शेतकऱ्यांना बँकांच्या उंबरठ्यावर उभे ठेवण्याचे पाप हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांना जर सन्मानाने जगवायचे असेल, तर तात्काळ बिनशर्त कर्जमुक्ती झाली पाहिजे,” असा घणाघाती आरोप ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या या फसव्या कर्जमाफीचा कडाडून निषेध करण्यासाठी आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘कष्टकरी शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने दौंड-अहिल्यानगर महामार्गावरील अत्यंत गजबजलेल्या कोळगाव फाटा येथे शुक्रवार (दि. १९ जून २०२६) रोजी सकाळी ९:०० वाजता तीव्र “रास्ता रोको आंदोलन” छेडण्यात आले. या आंदोलनात हजारो संतप्त शेतकरी डोक्याला लाल आणि पांढरे रुमाल बांधून रस्त्यावर उतरले होते.
सकाळी ९:०० वाजताच हजारो शेतकऱ्यांनी कोळगाव फाटा येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मैलोन्मैल लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास शेतकरी तळपत्या उन्हात महामार्गावर पाय रोवून बसले होते. ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘फसवी कर्जमाफी रद्द करा’, ‘अन्यायकारक भारनियमन बंद करा’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
आंदोलनाची भीषणता लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर श्रीगोंद्याचे तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि मागण्यांचे लेखी निवेदन स्वीकारले.
१) बिनशर्त सरसकट कर्जमाफी: राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटी, शर्ती किंवा क्लिष्ट नियमांच्या जाळ्यात न अडकवता थेट दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. २) जाचक भारनियमन रद्द करा: महावितरण कंपनीने ग्रामीण भागात सुरू केलेले अत्यंत अन्यायकारक भारनियमन (Load Shedding) तातडीने रद्द करावे. शेतकऱ्यांना शेती पंपांसाठी दिवसा अखंडित, नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा. ३) बिबट्यांचा बंदोबस्त करा: श्रीगोंदा परिसरात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतात काम करणारे शेतकरी, महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने तत्परता दाखवून विशेष मोहीम राबवावी, ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि शेतकरी कुटुंबांना सुरक्षित जीवन द्यावे.
तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर शेतकरी नेत्यांनी सरकारला कडक शब्दांत चेतावणी दिली आहे. जर या मागण्यांवर प्रशासनाने आणि सरकारने शनिवार व रविवार या दोन दिवसांत तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर सोमवार (दि. २२ जून २०२६) रोजी सकाळी १०:०० वाजता ‘संत शेख महाराज मंदिर’ येथून हजारो शेतकऱ्यांचा एक विराट मोर्चा थेट श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयावर धडकेल आणि तिथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल, असा आक्रमक इशारा ज्येष्ठ शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व करताना ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर अत्यंत आक्रमक शब्दात म्हणाले:
“शेतकरी हा या देशाचा आणि मातीचा खरा कणा आहे. पण आज त्याच बळीराजाला विजेसाठी, पाण्याासाठी आणि स्वतःच्या हक्काच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उन्हातान्हात बसावे लागत आहे, ही या राज्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे. एका बाजूला वीज नाही, बँकेचे कर्ज डोक्यावर आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतात काम करायला जावे तर बिबट्याची भीती आहे! अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. जर सोमवारपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय झाला नाही, तर सोमवारचा मोर्चा हा या सरकारची झोप उडवणारा ठरेल. शेतकऱ्यांच्या प्रत्येक न्याय्य हक्कासाठी आणि या लढ्यासाठी ‘मॅक्स मंथन’ डेली न्यूज ‘ हे चॅनल नेहमीच आमची ताकद बनून खंबीरपणे उभे राहिले आहे आणि भविष्यातही राहील!”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.




