नाल्याच्या जाळीवरून नगरपरिषद आणि रेल्वे प्रशासन आमनेसामने; रेल्वेचा जाळी काढण्यास नकार, मुर्तीजापुरात चिंता वाढली
अकोला / मुर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे, ८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुर्तीजापुर: शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील राम मंदिर परिसरातील मुख्य नाल्यावर लावलेली लोखंडी जाळी काढण्यावरून नगरपरिषद आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. रेल्वे विभागाने ही जाळी काढण्यास स्पष्ट नकार दिल्याने पावसाळ्याच्या तोंडावर स्थानिक नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
नगरपरिषदेने केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर देताना रेल्वे विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रेल्वेच्या दाव्यानुसार, जर नाल्यावरील लोखंडी जाळी काढली, तर शहरातील संपूर्ण कचरा आणि घाण रेल्वे कॉलनीच्या भागातील नाल्यात जाऊन साचेल. यामुळे नाल्याचा प्रवाह खंडित होऊन पाणी रेल्वे वसाहतीत शिरण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे कारण देत रेल्वेने जाळी काढण्यास असमर्थता दर्शवली आहे.
एकीकडे रेल्वे प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे रक्षण करण्यासाठी जाळी काढायला तयार नाही, तर दुसरीकडे याच जाळीमुळे प्रभाग ९ मधील कचरा अडकून पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, पावसाळ्यात हे घाण पाणी थेट स्थानिक नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती कायम आहे. दोन प्रशासकीय यंत्रणांच्या या वादात सामान्य नागरिक मात्र मध्यभागी भरडला जात आहे.
रेल्वेच्या या ठाम भूमिकेनंतर आता मुर्तीजापुर नगरपरिषद काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने येथील रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. नाल्याची स्वच्छता करण्यासाठी काही पर्यायी तांत्रिक व्यवस्था केली जाते की दोन्ही प्रशासने मिळून यावर सुवर्णमध्य काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तातडीने तोडगा न निघाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.








