घरेलू कामगारांना ‘सुरक्षिततेचा हक्क’ मिळावा! सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने कायदा करावा – मेळाव्यात एकमुखाने मागणी
पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक घरेलू कामगार दिनानिमित्त मेळावा; ‘श्रम प्रतिष्ठा पुरस्कारांचे’ वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
पिंपरी, १६ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): महाराष्ट्रसह देशभरातील कोट्यवधी घरेलू कामगारांचे जीवन आजही असुरक्षित असून, त्यांना कायदेशीर हक्क आणि अधिकार प्राप्त होत नाहीत. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, अपघाती विमा, किमान वेतन आणि पिळवणूक टाळण्यासाठी तात्काळ कायदा होणे महत्त्वाचे आहे. याच मागणीसाठी जागतिक घरेलू कामगार दिनानिमित्त आज पिंपरी-चिंचवड येथे आयोजित घरेलू कामगार मेळाव्यात केंद्र सरकारने घरेलू कामगार कायदा त्वरित मंजूर करून कामगारांना सुरक्षा द्यावी, असा निश्चय एकमुखाने करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, तरीही सरकारची चालढकल: ‘हा कायदा त्वरित करा!’
माननीय सर्वोच्च न्यायालयाने २९ जानेवारी रोजीच केंद्र सरकारला घरेलू कामगारांचा केंद्रीय कायदा करावा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, याला आता पाच महिने उलटूनही सरकारने याबाबत चालढकल केल्याचे दिसत आहे. या दिरंगाईवर आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ आणि घरेलू कामगार विभागाकडून आज पिंपरी चिंचवड येथील थरमॅक्स चौकाजवळ, संघटनेच्या प्रांगणामध्ये भव्य घरेलू कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याची सुरुवात कष्टकरी महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, तसेच कष्टकरी कामगारांचे गीत गाऊन झाली.
‘श्रम प्रतिष्ठा पुरस्कार’ आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कष्टकरी महिलांचा सन्मान!
अनेक वर्षांपासून घरकाम करून आपल्या कुटुंबांना प्रगतीपथावर नेणाऱ्या कष्टकरी महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले. सरस्वती प्रधान, राणी ठोकळ, राधाबाई ताकतोडे, विजया पाटील यांना ‘घरेलू कामगार श्रम प्रतिष्ठा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर, घरेलू कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये राणी नायडू, मयुरी उघडे, श्रद्धा वाघोले, रिद्धी खरात, जैनब पठाण, हर्षिता कांबळे यांचा समावेश होता.
यावेळी कामगार नेते तथा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार, इंदुबाई वाकचौरे, मुमताज शेख, नंदा जाधव, माया शेटे, महानंदा घळगे, प्रियांका काटे, सुमन क्षीरसागर, सुनिता देवतरसे, कौशल्य खताळ, सुगंधा चव्हाण, सुमन कांबळे, मालन गोरे, विमल वाघोले, पूजा कांबळे, सुषमा नेटके, मनीषा शेलार, पार्वती भिसे, रेश्मा चव्हाण, मनीषा मेहंदळे, आशा अडसूळ, राजश्री चव्हाण, सरस्वती गरड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता इंगळे यांनी केले तर आभार अश्विनी मालुसरे यांनी मानले.
कामगार नेत्यांचा एल्गार: ‘केंद्र सरकारने कायदा न केल्यास अवमान याचिका’ – काशिनाथ नखाते
यावेळी बोलताना कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सांगितले की, देशातील कोट्यवधी घरेलू कामगारांची हाक माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऐकली आणि केंद्राला कायदा करण्याचे आदेश दिले. मात्र, सहा महिने होत आले तरी केंद्र सरकार यावर पावले उचलल्याचे दिसत नाही. “असे झाल्यास सरकारच्या विरोधात अवमान याचिका दाखल करावी लागणार आहे,” असा इशारा नखाते यांनी दिला. घरेलू कामगार हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या महामंडळाला आर्थिक निधीसह पुनर्जीवित करून त्यांना लाभ देणे आणि नवीन कायद्याद्वारे त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत तातडीने बैठक बोलावणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे म्हणाल्या की, जिजाऊ, सावित्री, रमाई आणि अहिल्या यांसारख्या महान स्त्रियांची रूपे आज सर्व घरेलू कामगारांमध्ये दिसत असून, घरेलू कामगार हा आघाडीवर आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील कामगारांचे अनेक प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. त्यांनी सर्व घरेलू कामगारांना प्रत्येक लढाईत सहभागी होण्याचे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होत असला तरी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना विसरू नये, त्यांची सेवा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. महिला अध्यक्षा माधुरी जलमुलवार यांनी कामगारांचे आरोग्याचे प्रश्न मोठे असून त्यांना विमा मिळावा, तसेच जिल्हा पातळीवर त्रिपक्ष समितीची स्थापना होऊन त्यांना लाभ मिळावा, अशी मागणी केली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.