news
Home अमरावती ‘बालक दिनी’ बालविवाह रोखण्याची शपथ! – अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची मुख्याध्यापक, सरपंचांवर मोठी जबाबदारी

‘बालक दिनी’ बालविवाह रोखण्याची शपथ! – अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची मुख्याध्यापक, सरपंचांवर मोठी जबाबदारी

मुलींची गैरहजेरी आढळल्यास तातडीने माहिती द्या; डॉ. दिलीप सौंदळे, विलास मसराळे, डॉ. रंजन वानखडे बैठकीला उपस्थित. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

बालविवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची

 


 

‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन; किशोरी मेळावे घेण्याचे निर्देश

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

बालविवाह रोखण्यासाठी गावातील नागरिक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आणि लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले. बालविवाह होत असल्यास गावातील नागरिकांना याची माहिती असते, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हे विवाह रोखले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र, आपला संकल्‍प अभियान’ च्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जिल्ह्यात मुला-मुलींचा जन्मदर समाधानकारक असला तरी, काही भागात बालविवाह होत असल्याने माता आणि बालकांचे चांगले पोषण होत नाही. त्यामुळे मातृमृत्यू आणि बालमृत्यूची स्थिती चिंताजनक बनली आहे. यावर मात करण्यासाठी कमी वयात होणारे विवाह रोखणे अत्यंत आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या प्रमुख सूचना:

  • जागरूकता: शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाभरात किशोरी मेळाव्यांसारखे उपक्रम राबविण्यात यावेत.
  • मेळघाटात विशेष लक्ष: मेळघाटात कोरकू बोलीभाषा असल्याने जनजागृतीसाठी त्यांच्याच भाषेचा उपयोग करावा.
  • मुख्याध्यापकांची जबाबदारी: शाळेतून मुलींची अचानक गैरहजेरी जाणविल्यास, मुख्याध्यापकांनी त्वरित समितीला माहिती द्यावी. अशा मुलींचा बालविवाह होत असल्यास तातडीने माहिती कळवावी.
  • ग्रामस्थांवर कार्यवाही: गावात बालविवाह झाल्यास, याची माहिती असूनही ती न कळवल्यास ग्रामसेवक आणि सरपंचांवर कार्यवाही करण्याची जबाबदारी सोपवण्यात यावी.
  • बालक दिनी शपथ: जनजागृती महत्त्वाची असल्याने येत्या बालकदिनी (Children’s Day) बालविवाह रोखण्याची शपथ सर्व शाळांमध्ये घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी कृति आराखडा तयार करून जिल्ह्यात कार्यक्रम राबवावेत. गावातीलच महिलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले असल्यास, अशांचा सत्कार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बालविकास उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास मसराळे, माविमचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश टेकाळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, पोलिस विभागाच्या दिप्ती ब्राम्हणे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी बालविवाह रोखण्याची शपथ घेतली.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!