‘शिक्षण पद्धतीत संतसाहित्य आले पाहिजे’ – डॉ. विजय लाड यांचे प्रतिपादन; मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण संपन्न
भारताला विश्ववंदित राष्ट्र बनवण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या अभ्यासक्रमात संतसाहित्याचा समावेश गरजेचा: डॉ. विजय लाड
पिंपरी, पुणे, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २५ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवापर्यंत, म्हणजेच २०२५ ते २०४७ या काळात, भारत देशाची प्रतिमा विश्ववंदित राष्ट्र म्हणून उभी राहिली पाहिजे. यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या शिक्षण पद्धतीत संतसाहित्याचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे, असे स्पष्ट मत शिवथर घळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले.
ते निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी मधील मनोहर सभागृहात मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात शनिवारी (दिनांक २२ नोव्हेंबर २०२५) रोजी बोलत होते.
डॉ. विजय लाड म्हणाले की, संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहाराचा साक्षेपाने विचार केला आहे. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘दासबोधा’त विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात. संतांनी जीवनात संपन्नता असावी, पण ती किती असावी याबाबत मार्गदर्शन केले आहे. संत विभूती आहेत आणि त्यांची शिकवण तळागाळात पोहोचवायला हवी, समाजात संतांचे विचार रुजवायला हवेत. त्यांनी तरुणांनी संत साहित्य वाचले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष नितीन भाई कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी आणि सुभाष देशपांडे उपस्थित होते.
उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी म्हणाले की, गेल्या २७ वर्षांपासून राज्यभरात संत साहित्य पुरस्काराचे वितरण केले जात आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी प्रथमच लेखक आणि प्रकाशक या दोघांना पुरस्कार दिला जात आहे. यातून संत साहित्याचा प्रसार आणि लेखन अधिक व्हावे, हा उद्देश आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभ “बोलावा विठ्ठल…” या भक्तिगीताने झाला, तर “रत्नाकरा…” या प्रार्थनेने समारोप करण्यात आला. यावेळी समीक्षक राधा गोडबोले आणि डॉ. रजनीताई पत्की यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अभिलेखा शिंदे यांनी केले आणि सुभाष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
चिंतनपर आणि विवेचनपर पुस्तकांचा गट:
| क्रमांक | पुरस्कार प्राप्त ग्रंथ | लेखक/प्रकाशक |
| प्रथम | पाऊले तुकोबांची | डॉ. कल्पना काशीद, डॉ. विश्वास मोरे |
| द्वितीय | विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंम | रोहन उपळेकर |
| तृतीय | आद्य शंकराचार्य कृत सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह आणि पूर्णकळा | डॉ. के. वा. आपटे आणि डॉ. नारायण रघुनाथ देशपांडे |
विशेष पुरस्कार:
-
क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर – डॉ. श्यामा घोणसे
-
श्री गणेशोत्सव गीतसार – विश्वनाथ छत्रे
(हे पुरस्कार विभागून देण्यात आले.)
संत जीवन आणि ललित साहित्य गट:
| क्रमांक | पुरस्कार प्राप्त ग्रंथ | लेखक/प्रकाशक |
| प्रथम | षष्ठ पंचशीका | डॉ. के. वा. आपटे |
| द्वितीय | सार्थ श्रीराम गीता | डॉ. सुनिती सहस्रबुद्धे |
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
