Home वसई-विरार मुख्यमंत्र्यांवर ३ हजार कोटींच्या लाचेचा आरोप!

मुख्यमंत्र्यांवर ३ हजार कोटींच्या लाचेचा आरोप!

राज्यातील मोठ्या प्रकल्पांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी; राजकीय वातावरण तापले!

by maxmanthannews@gmail.com
0 comments

घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी लाच घेतल्याचा काँग्रेसचा आरोप! (मॅक्स मंथन डेली न्यूज, नवी दिल्ली/मुंबई)

राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट; १ लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा संशय; सर्व प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा – हर्षवर्धन सपकाळ.

नवी दिल्ली/मुंबई, दि. ३१ मे २०२५: घोडबंदर-भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील भाजप युती सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. न्यायालयात सरकारचे पितळ उघडे पडल्याने राज्य सरकारला निविदा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. या प्रकल्पात मोठा घोटाळा असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ हजार कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या प्रकल्पात दुसऱ्या निविदाधारकाची निविदा तांत्रिक कारणे देत रद्द करण्यात आली. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले, ती ‘मेघा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनी कोणाची आहे? यामागे काय रहस्य आहे? हे आता सर्वांसमोर आले आहे. एमएमआरडीएने निविदा रद्द केल्याने हा विषय संपलेला नाही, हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराचा कॉरिडॉर तयार केला आहे. एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, एसआरए यांचे एक मोठे जाळे आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून हे भ्रष्टाचाराचे जाळे सक्रिय झाले आहे. यासाठी लाडके अधिकारी नियुक्त केले जातात आणि लाडक्या ठेकेदारांना कामे दिली जातात.

हा विषय केवळ एका प्रकल्पापुरता मर्यादित नसून राज्यात समृद्धी महामार्ग, पुणे रिंगरोड, विरार-अलिबाग कॉरिडॉर आणि आता शक्तीपीठ महामार्ग हे सर्व प्रकल्प भ्रष्टाचाराची कुरणे बनली आहेत. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे दुष्टचक्र सुरू आहे. ठाणे, मुंबई परिसरातील प्रकल्प या घोटाळ्याचा भाग आहेत. ‘५० खोके एकदम ओके’चा पैसा आणि निवडणुकीत ‘पैसा फेक तमाशा देख’चा पैसा याच घोटाळ्यातून आला होता. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांवर प्रशासक राज्य सरकारने नियुक्त केले आहे. फडणवीस आणि शिंदे यांनी या माध्यमातून एक मोठे रॅकेट चालवले आहे. यातून तब्बल १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा संशय आहे. म्हणून या सर्व प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मराठी भाषेला गुंडाळले:

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सरनाईक भाजपचा अजेंडा चालवत आहेत. त्यांना मराठी भाषा नष्ट करायची आहे आणि हिंदी व हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. एकनाथ शिंदे सुरतमार्गे गुवाहाटीला पळाले, तेव्हाच या पक्षाने मराठी भाषेला गुंडाळून ठेवले आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सर्वात आधी आवाज उठवला, त्यानंतर इतर पक्षांनी तीच भूमिका घेतली. सक्ती शब्द मागे घेण्याची घोषणा झाली, पण अद्याप त्याचा शासन निर्णय निघालेला नाही. यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे स्पष्ट आहे. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा आहेत आणि राज्यात कठपुतळीचा खेळ सुरू आहे. परंतु मराठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे सपकाळ म्हणाले.

माणिकराव कोकाटे ‘ढेकळ्या मंत्री’:

कृषी मंत्रालय हे ओसाड गावची पाटीलकी आहे, या माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, हे मंत्री आहेत की वाचाळवीर, असे म्हणायची वेळ आली आहे. त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली आणि आता त्यांनी जे विधान केले आहे, त्याचा अर्थ म्हणजे शेती राहिली नाही, उद्योगपतींची चाकरी करा, असा आहे. हे कृषिमंत्री नाहीत, तर ‘ढेकळ्या मंत्री’ आहेत, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

Leave a Comment

error: Content is protected !!