कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी! माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान! (मॅक्स मंथन डेली न्यूज, छत्रपती संभाजीनगर)
‘ढेकळांचे पंचनामे’नंतर आता ‘ओसाड गावची पाटीलकी’; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!
छत्रपती संभाजीनगर: “कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते दिले आहे,” असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले. यापूर्वी ‘ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ या त्यांच्या विधानामुळे ते टीकेचे धनी ठरले होते. आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आले आहेत.
अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी जाणीवपूर्वक कृषी खाते दिल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन शेती आधारित व्यवसायात करिअर करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
‘ढेकळांचे पंचनामे’वर कोकाटेंचे स्पष्टीकरण:
“हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” या विधानावर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मी असं काही बोललोच नाही,” असे त्यांनी सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी पेरणी पूर्ण झाली असून फळबागांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी कांद्याचेही नुकसान झाले आहे. जेवढं नुकसान झालं आहे, त्यानुसार पंचनामे करण्यास सांगितलं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे.
कोकाटेंच्या या नव्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.