news
Home पिंपरी चिंचवड जीवघेणा निष्काळजीपणा: कामशेतमध्ये शालेय बस चालकाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला!

जीवघेणा निष्काळजीपणा: कामशेतमध्ये शालेय बस चालकाने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला!

अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प असतानाही बस पाण्यात; रयत विद्यार्थी विचार मंचच्या अजय यादव यांचा गंभीर आरोप. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पालकांनो सावधान! जीवघेणा निष्काळजीपणा: कामशेतमध्ये पूर आलेल्या ओढ्यातून शाळकरी विद्यार्थ्यांची बस काढण्याचा धक्कादायक प्रकार!

‘सेंट थॉमस हायस्कूल’च्या बस चालकाचा बेजबाबदारपणा; ‘रयत विद्यार्थी विचार मंच’च्या अजय यादव यांनी केली तक्रार!

पिंपरी-चिंचवड, २१ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पावसाळी ऋतू सुरू होताच आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा काळात मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्यांवरच बेजबाबदारपणाचा आरोप झाला आहे. मावळ तालुक्यातील कामशेत येथील सेंट थॉमस हायस्कूलच्या बस चालकाने काल (शुक्रवार, २० जून) कांब्रे येथील पूर आलेल्या ओढ्यातून तब्बल ३० ते ४० शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन बस काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र राज्य सदस्य अजय यादव यांनी हा प्रकार उघडकीस आणत शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार केली आहे.


नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी कांब्रे येथील ओढ्याला अति प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे ओढ्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशा धोकादायक परिस्थितीतही सेंट थॉमस हायस्कूलच्या बस चालकाने कसलाही विचार न करता, ३० ते ४० शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन भर पाण्यात गाडी घातली.

या प्रकाराबद्दल अजय यादव यांनी चालकाला जाब विचारला असता, त्याने “हे काही नाही,” अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून गेला. चालकाच्या या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.


शाळा प्रशासनाकडे तक्रार, मुख्याध्यापकांनी दिली समज

या घटनेची गंभीर दखल घेत अजय यादव यांनी आज (शनिवार, २१ जून) सेंट थॉमस हायस्कूल, कामशेत येथील मुख्याध्यापिकांची भेट घेऊन या घटनेची तक्रार केली. मुख्याध्यापकांनी तात्काळ बस ड्रायव्हरला बोलावून त्याची चौकशी केली आणि त्याला समज दिली. “असे पुन्हा होणार नाही,” असे आश्वासन मुख्याध्यापकांनी यादव यांना दिले.

अजय यादव यांनी पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. “आपण आपल्या मुलांना ज्यांच्या भरवशावर शाळेत सोडता, ते कसे बेजबाबदारपणाने वागतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी,” असे यादव यांनी म्हटले आहे.

पावसाळ्यात नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असताना, वाहनचालकांनी अधिक सतर्क राहण्याची आणि कोणताही धोका न पत्करण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!