“इंधन वाचवा, देश वाचवा; तेल जपा, आरोग्य जपा!” पिंपरी-चिंचवड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ‘इंधन व खाद्यतेल बचत’ जनजागृती मोहीम उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “घरच्या बजेटचे योग्य व्यवस्थापन आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सुदृढ आरोग्य राखणे ही घरातील गृहिणीची म्हणजेच स्त्रीची सर्वात पहिली जबाबदारी असते. आजच्या महागाईच्या काळात इंधनाची बचत करणे आणि आहारातील खाद्यतेलाचा वापर अत्यंत मर्यादित ठेवणे, हा केवळ वैयक्तिक आर्थिक फायद्याचा विषय नसून ते आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि देशाच्या शाश्वत विकासासाठी टाकलेले अत्यंत क्रांतीकारी पाऊल आहे. भाजपा महिला मोर्चाने शहरात सुरू केलेले हे अभियान म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला सुदृढ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय यज्ञ आहे,” असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा सौ. सुजाताताई पलांडे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘इंधन संरक्षण आणि खाद्यतेल बचत’ या अभिनव जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे, विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री. महेशदादा लांडगे, आमदार श्री. शंकरभाऊ जगताप, आमदार सौ. उमाताई खापरे आणि आमदार श्री. अमित गोरखे यांच्या विशेष सहकार्याखाली हे अभियान शहराच्या विविध भागांत यशस्वीपणे राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्या, वस्त्या आणि प्रभागांमध्ये जाऊन महिलांशी थेट संवाद साधला. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाद्यतेलाच्या अतिवापराचे दुष्परिणाम महिलांना समजावून सांगण्यात आले. जेवणात तेलाचा वापर कमी केल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते, हृदय निरोगी राहते आणि रक्तदाबाचा त्रास टाळता येतो, याविषयी महिलांना जागरूक करण्यात आले. एकदा कढईत तापवलेले तेल पुन्हा पुन्हा वापरल्याने शरीरात विषारी घटक (Carcinogens) तयार होतात. त्यामुळे असा घातक पुनर्वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.
वाढते प्रदूषण आणि इंधनाचा अवाजवी खर्च टाळण्यासाठी नागरिकांना इंधन बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला गेला, 1. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नलवर उभे असताना वाहनाचे इंजिन बंद ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होते व वायू प्रदूषण कमी होते. 2. शक्य असेल तिथे खाजगी वाहने टाळून पीएमपीएमएल (PMPML) बस किंवा मेट्रोचा वापर वाढवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
हा व्यापक सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजपचे संघटन सरचिटणीस श्री. मधुकर बच्चे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. महिला मोर्चाच्या वतीने सरचिटणीस अनघा रुद्र, उपाध्यक्ष ऐश्वर्या बाबर, चिटणीस स्वाती देशमुख, उपाध्यक्ष संजना मराठे आणि जयश्री मकवाना यांनी संपूर्ण शहरामध्ये या मोहिमेचे शिस्तबद्ध समन्वय साधत उत्तम व्यवस्थापन केले.
या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे महिला मोर्चाच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आणि मंडल अध्यक्षांनी थेट प्रत्यक्ष जमिनीवर उतरून (Ground Level) घरोघरी संपर्क साधला. प्रभागात जाऊन महिलांना पत्रके वाटणे आणि त्यांना बचतीचे महत्त्व समजावून सांगण्यामध्ये मंडल अध्यक्षा नीता कुशारे, स्वाती जाधव, जोशना कलाटे आणि किरण पाचपांडे यांनी पुढाकार घेतला. तसेच, पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी मनीषा कुलकर्णी, मीनाक्षी गायकवाड, वसुधा देशपांडे, सुप्रिया वझे, स्वाती पवार आणि नीता भालेराव यांनी नागरिकांशी थेट सुसंवाद साधून अभियानाचा संदेश घराघरांत पोहोचवला.
सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक आरोग्याचा सुरेख मिलाफ साधणाऱ्या या अत्यंत लोकोपयोगी मोहिमेचे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून आणि विविध पर्यावरणप्रेमी संस्थांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


