46
आत्मनिर्भर युवा पिढी हेच विकसित राष्ट्राचे बलस्थान — अतुल बोरगावकर!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: “आत्मनिर्भर युवा पिढी हेच खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्राचे मुख्य बलस्थान आहे. त्यामुळे आजच्या तरुण-तरुणींनी केवळ क्रमिक अभ्यासक्रमावर अवलंबून न राहता पदवी मिळवतानाच विविध कौशल्य विकास (Skill Development) प्रशिक्षणाचाही अंगीकार केला पाहिजे,” असे प्रतिपादन ‘वनाज इंजिनियर्स लिमिटेड’चे मुख्य कार्मिक अधिकारी अतुल बोरगावकर यांनी व्यक्त केले.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर संस्थेच्या ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोरगावकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “आजच्या आधुनिक युगात कौशल्याचे आणि आत्मनिर्भरतेचे स्वातंत्र्य हेच खऱ्या अर्थाने शाश्वत स्वातंत्र्य बनले आहे. त्यामुळे प्रत्येक युवकाने आपल्या क्षेत्रात अधिकाधिक नैपुण्य व कौशल्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”
या प्रसंगी ‘आयआयएमएस’ (IIMS) च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या टी-शर्ट पेंटिंग स्पर्धेत विजेते ठरलेल्या साक्षी भापकर, प्रतीक्षा धोंडगे आणि अस्मित पंडित या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे, संस्थेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जेजेराव बाईलके व गणेश पन्हाळे या कर्मचाऱ्यांचा विशेष प्रमाणपत्र आणि धनादेश प्रदान करून भव्य सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास ‘यशस्वी एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’चे (IIMS) संचालक डॉ. शिवाजी मुंढे, यशस्वी संस्थेचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन शर्मा व स्वप्निल देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

