आयटीआयमध्ये नव्या अभ्यासक्रमांचा समावेश: मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मोठी घोषणा!
स्थानिक आयटीआयला ‘न्यू एज कोर्सेस’ सुरू करण्यास तात्काळ मंजुरी मिळणार; कौशल्य विकासाला मिळणार गती, रोजगाराच्या नव्या संधींची कवाडे खुली!
पुणे, दि. १५ जुलै २०२५: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आता आधुनिक युगाची गरज ओळखून मोठे बदल होणार आहेत! राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावर्षीपासून आयटीआयमध्ये आधुनिक ६ नवे अभ्यासक्रम (New Age Courses) सुरू करण्यात येत असून, प्रत्येक आयटीआयने परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन किमान एक ते दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करावेत, असे निर्देश त्यांनी विभागाचे अधिकारी आणि आयटीआयच्या प्राचार्यांना दिले.
तात्काळ मंजुरी आणि निधीची हमी!

औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील आयटीआयचे प्राचार्य तसेच संस्था व्यवस्थापन समित्यांच्या सदस्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्री लोढा बोलत होते. यावेळी व्यवसाय प्रशिक्षण सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रतिभा चव्हाण, औंध आयटीआयचे उपसंचालक सचिन धुमाळ आदी उपस्थित होते.
मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले, “आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आधुनिक काळाची गरज ओळखून नवनवीन कौशल्ये शिकविणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने नवकौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित आयटीआयने आपल्या संस्थेत सुरू करावयाच्या अभ्यासक्रमाबाबतचे प्रस्ताव दिल्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही.”
याशिवाय, आपल्या संस्थेकडे कोणते नवीन आणि आर्थिक मागणी असू शकतील, असे अभ्यासक्रम देखील सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तीन आणि सहा महिन्यांचे अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यातून अधिकचे उत्पन्न मिळून संस्थेच्या विकासाला चालना मिळू शकेल, अशा सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या.
‘नव्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधी’: गौरव वाळुंजकर

या निर्णयाचे स्वागत करताना, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन येथील शासकीय सदस्य, संस्था व्यवस्थापन कमिटीचे श्री. गौरव वाळुंजकर म्हणाले, “आज बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे पुढील कौशल्य विकास प्रशिक्षण कामाला गती मिळेल आणि यातूनच नवकौशल्य घेऊन विद्यार्थी प्रगती करू शकेल, त्यासोबत स्थानिक आयटीआय संस्थांना नव्याने चालना मिळेल. तसेच नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमामुळे नव्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.”
या निर्णयामुळे राज्यातील युवकांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
