पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा अंधारात अभ्यास, ‘वर्क फ्रॉम होम’ला खीळ
महावितरणच्या ढिसाळ कारभारावर युवासेना उपशहर प्रमुखांचे तीव्र टीकास्त्र; तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे १५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना तक्रार पत्र सादर केले आहे.
अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना मोठा त्रास
प्रभाग क्रमांक १४ मधील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, विवेकानगर, तुळजा वस्ती, एकतानगर, रुपेश कॉलनी, टेल्को-कपूर कॉलनी, उंबरवाडी, श्रीकृष्ण-क्रांतीनगर, बौद्ध वस्ती, सुभाष पांढरकर नगर, भंगारवाडी, खडीमशीन परिसर, काळभोरनगर, रामनगर, मोहननगर, फुलेनगर, गवळीवाडा, चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर आणि दावा बाजार यांसारख्या विविध परिसरांमध्ये रोज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दळवी यांनी पत्रात नमूद केले आहे.

विद्यार्थी आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांचे हाल
या खंडित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थी आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षांमुळे लहान मुलांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. तसेच, घरी बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि इंटरनेटसाठी वीजपुरवठा आवश्यक असल्याने त्यांच्या कामात मोठा खोळंबा होत आहे. चार-चार, पाच-पाच तास वीज गायब असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे, तक्रार करण्यासाठी महावितरणच्या कंप्लेंट नंबरवर फोन केला असता, तो उचलला जात नसल्याचीही तक्रार दळवी यांनी केली आहे.
नियमितपणे वीज बिल भरूनही नागरिकांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नाही. त्यामुळे महावितरणने यावर तात्काळ उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी निखिल दळवी यांनी केली आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
