खळबळजनक! मनरेगा विहीर घोटाळ्यातील तक्रारदारावर मूर्तिजापुरात जीवघेणा हल्ला; पोलिसांकडून तक्रार घेण्यास नकार, एसपींकडे धाव
अकोला/मूर्तिजापूर प्रतिनिधी: विलास सावळे, १८ मार्च २०२६ | मॅक्स मंथन विशेष:
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील मनरेगा विहीर बांधकामातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या सहकाऱ्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या गंभीर घटनेची तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला पोलीस स्टेशनमधून पिटाळून लावल्याचा आरोप होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेलू वेताळ येथील रवींद्र उत्तमराव ठाकरे (वय ४३) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांच्याकडे दिलेल्या लेखी अर्जानुसार, त्यांच्या गावात मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरींचे काम मंजूर झाले होते. या विहिरींचा ठेका गावातीलच कुलदीप शेषराव सदार याने घेतला आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वामन लक्ष्मण वानखडे यांनी प्रशासनाकडे केली होती. रवींद्र ठाकरे हे वानखडे यांच्या संपर्कात असल्याने, “तूच वामनला तक्रार करण्यास भाग पाडतो,” असा संशय धरून कुलदीप सदार याने ठाकरे यांच्यावर हल्ला केला.
दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास रवींद्र ठाकरे हे मूर्तिजापूर नगरपालिका कॉम्प्लेक्स जवळील एका लॉन्ड्री दुकानाबाहेर उभे होते. यावेळी आरोपी कुलदीप सदार तिथे आला आणि त्याने “तू लय माजला काय? त्या वामनला का भडकवतो?” असे म्हणत ठाकरे यांचे गचांडी पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रकाश बायस्कर यांनी मध्यस्थी करून ठाकरे यांची सुटका केली.
घटनेनंतर रवींद्र ठाकरे तात्काळ मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, तिथे हजर असलेले पीएसआय राठोड यांनी तक्रार घेण्यास स्पष्ट नकार दिला. “तू प्रशासनाची दिशाभूल करतो,” असे म्हणत त्यांनी ठाकरे यांच्यावरच दबाव टाकल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे निराश होऊन ठाकरे यांनी थेट अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
“माझ्या जीवितास आता धोका निर्माण झाला असून, जर माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर त्याला सर्वस्वी शहर पोलीस स्टेशनचे पीसाई आणि कर्मचारी जबाबदार राहतील,” असा इशारा रवींद्र ठाकरे यांनी आपल्या तक्रारीत दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।
.
