विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तंत्रज्ञानाधारित उद्योगांची गरज; पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , ७ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड: “२०४७ पर्यंत भारताला विकसित देश म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. एआय (AI), डिजिटायझेशन आणि ईआरपी तंत्रज्ञानामुळे उद्योगांची उत्पादकता वाढून मोठी रोजगारनिर्मिती होईल,” असे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘एक्स्पोनॉमिक्स इव्हेंट्स’च्या वतीने आयोजित भारतातील पहिल्या ‘ईआरपी’ औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
मिलिंद कांबळे यांनी नमूद केले की, महाराष्ट्राचे धोरण गुंतवणुकीला पूरक असून भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ४० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात, त्यातही पुण्यात येते. कोरोना काळात भारताने मोठी डिजिटल क्रांती केली असून आता एआय, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग स्वीकारणे ही उद्योगांची गरज बनली आहे.
उत्पादन, वित्त, लॉजिस्टिक्स, रिटेल, हेल्थकेअर आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील अत्याधुनिक डिजिटल सोल्युशन्स येथे सादर करण्यात आले आहेत. देशभरातील १०० हून अधिक ईआरपी कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि स्टार्टअप्स यात सहभागी झाले आहेत. तज्ज्ञांची सत्रे, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांचा अनुभव घेता येणार आहे. हे प्रदर्शन शनिवार, ९ मे पर्यंत सकाळी १० ते ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
कार्यक्रमाला संयोजक सागर अहिवळे, मिलिंद हडप, आरती भोसले-अहिवळे, श्रद्धा कुलकर्णी, रॉड अल्बुकर्क, दीपान रामलिंगम, महेंद्र फणसे, दिलीप बटवाल आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे या उपक्रमाचे कौतुक केले.
“पुणे हे आता केवळ विद्येचे माहेरघर नसून आयटी आणि इंडस्ट्रियल हब बनले आहे. उद्योगांना पारंपरिक पद्धतीतून बाहेर काढून डेटा-आधारित बनवण्यासाठी हे प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास यावेळी विविध वक्त्यांनी व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
