“आंदोलकांचा आवाज म्हणजे विरोधी पक्षांचा आवाज नव्हे!” — ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; नीट पेपरफुटी अन् सोनम वांगचुक प्रकरणी केंद्रावर डागली तोफ!
अहिल्यानगर प्रतिनिधी, २३ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अहिल्यानगर: “संघर्षापेक्षा संवाद नेहमीच श्रेष्ठ असतो,” असा परखड सल्ला देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक पत्र लिहून केंद्र सरकारच्या कारभारावर आणि आंदोलनावरील दडपशाहीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केंद्र सरकारने स्वीकारलेली भूमिका ‘अलोकतांत्रिक’ असल्याचे सांगत, अण्णा हजारे यांनी सरकारला आरसा दाखवला आहे.
जंतर-मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, “जेव्हा जेव्हा सरकारच्या कामकाजात काही अनियमितता उघडकीस येते, तेव्हा त्याची सर्व जबाबदारी फक्त खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांवर ढकलली जाते आणि चांगल्या कामाचे श्रेय मात्र सरकार स्वतः घेते. ही अत्यंत अयोग्य पद्धत आहे. जनतेप्रती अंतिम उत्तरदायित्व हे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचेच असते.”
शिक्षणांसंदर्भातील गंभीर प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य असल्याचे सांगत अण्णा हजारे म्हणाले की, “मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास जबाबदारी निश्चित होईल आणि इतर सर्व मंत्र्यांपर्यंत एक कडक व स्पष्ट संदेश जाईल.”
देशातील तरुण, विद्यार्थी आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील असले पाहिजे, असे आवाहन करताना अण्णांनी पत्रात खालील गंभीर मुद्दे उपस्थित केले. २०२४ प्रमाणेच यंदाही नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्या आहेत. परीक्षेतील सावळागोंधळ आणि निराशेतून आतापर्यंत २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी बातम्या समोर आल्या आहेत. नव्याने घेतलेल्या परीक्षांच्या निकालांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली आहे. विद्यार्थ्यांची अस्वस्थता ही केवळ ‘कायदा आणि सुव्यवस्थेचा’ विषय म्हणून न हाताळता त्यांच्या मूळ प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढला पाहिजे.
अण्णा हजारे यांनी सरकारला आंदोलकांवर दडपशाही न करता संयम, संवेदनशीलता आणि सहिष्णुता दाखवण्याचे आवाहन केले आहे.
ते पत्रात पुढे म्हणाले:
“गेल्या २५ दिवसांपासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू असतानाही सरकारने दीर्घकाळ कोणताही संवाद साधला नाही, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आंदोलकांचा आवाज हा विरोधी पक्षांचा आवाज म्हणून पाहू नये. आंदोलक हे देखील याच देशाचे नागरिक आहेत. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने जाणाऱ्या या देशात मतभेद संवादाने आणि परस्परांच्या आदरानेच सुटले पाहिजेत.”
१५ वर्षांपूर्वी जंतर-मंतरवरूनच अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरोधात ऐतिहासिक आंदोलन छेडले होते. आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अण्णा हजारे यांच्या या पत्रामुळे मोठे नैतिक बळ मिळाले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
