मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘महिला कृषी सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न; २०० हून अधिक शेतकरी महिलांचा गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ‘महिला कृषी सन्मान सोहळा’ अत्यंत दिमाखात आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात २०० हून अधिक शेतकरी महिलांची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांनी “देवाभाऊ, धन्यवाद!” अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते झाली. याप्रसंगी विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांनी आजवर समाज, कुटुंब आणि शेती क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे महिलांना अधिक बळ, आत्मविश्वास आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त झाले आहे.
भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिला सक्षमीकरणाला खरी गती महायुती सरकारच्या काळातच मिळाली आहे. महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणून सन्मानाची ओळख देण्यासोबतच आता शेतकरी महिलांनाही स्वतंत्र शेतकरी म्हणून हक्काचे व सन्मानाची ओळख मिळाली आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता सुनील पालांडे यांनी शासनाच्या विविध धोरणात्मक निर्णयांची माहिती दिली. या वेळी सन्मानित झालेल्या शेतकरी महिलांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अहोरात्र कष्ट करूनही पूर्वी स्वतंत्र शेतकरी म्हणून दखल घेतली जात नव्हती, मात्र आता शासनाच्या निर्णयामुळे आम्ही अभिमानाने स्वतःची ओळख शेतकरी म्हणून सांगू शकत आहोत.”
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दादासाहेब क्षिरसागर आणि राजेश वसावे यांनी शेती, महिला सक्षमीकरण आणि शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. या सोहळ्यास संघटन मंत्री मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, महिला मोर्चाच्या प्रभारी हर्षदा फरांदे, माजी उपमहापौर शर्मिला बाबर, शैलजा मोरे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अर्चना तापकीर, स्नेहा कलाटे, आरती चौंधे, रेखा देवकर, राणी पठारे, अनिता काटे, राजश्री लांडगे, शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, महिला मोर्चाच्या सरचिटणीस अनघा रुद्र, रोहिणी मांढरे, गायत्री तळेकर, पल्लवी पाठक, स्वाती जाधव, किरण पाचपांडे, जयश्री मखवाना, मनीषा कुलकर्णी, प्रतिमा जवळकर, स्वाती देशमुख यांसह महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अनुपदादा मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा ऐश्वर्या बाबर यांनी केले, तर सरचिटणीस अनघा रुद्र यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची उत्साहात सांगता झाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


