‘साहित्यरत्न दौड २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो नागरिकांच्या सहभागाने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा घुमला गजर!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्यरत्न दौड २०२६’ ला आज चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकातून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पिंपरी-चिंचवडसह विविध शहरांतील हजारो नागरिकांनी या दौडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर केला.
या दौडीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या, परिवर्तनाच्या आणि शिक्षणाच्या विचारांचा गजर करत अत्यंत जल्लोषात आणि सकारात्मक ऊर्जेच्या वातावरणात दौडीला सुरुवात झाली.
या उपक्रमाला आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सभापती कैलास कुटे, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे, नगरसदस्य शत्रुघ्न बापू काटे, शितल शिंदे, तुषार हिंगे, कुशाग्र कदम, धर्मपाल तंतरपाळे, अनिल घोलप, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, सुजाता पलांडे, उमेश चांदगुडे, महापालिका उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, तसेच नेताजी शिंदे, गणेश लंगोटे, वैशाली खाडे, धरम वाघमारे, मंगेश घाडगे, अनिता वाळुंजकर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
आमदार अमित गोरखे या प्रसंगी बोलताना म्हणाले:
“साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार समाजासमोर मांडला. त्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘साहित्यरत्न दौड’ हे प्रभावी माध्यम ठरत आहे. ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून सामाजिक बांधिलकी, एकात्मता आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा लोकसहभागाचा उपक्रम आहे. युवकांनी निरोगी जीवनशैली स्वीकारत समाज परिवर्तनाच्या विचारांशी जोडले जावे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.”
या दौडीच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन करत शहरात सामाजिक ऐक्य, निरोगी जीवनशैली आणि युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. सहभागी नागरिकांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे जोरदार स्वागत केले असून अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


