अण्णाभाऊ म्हणजे सामाजिक व साहित्यिक परिवर्तनाचे ‘अशोकचक्र’ — डॉ. सतीश तराळ!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. २ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे बहुप्रसवा प्रतिभेचे धनी, शब्दप्रभू आणि शैलीकार होते. ते सामाजिक व साहित्यिक क्रांतिकारक असून खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे ‘अशोकचक्र’ होते. ४० कादंबऱ्या आणि १३ कथासंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षितांचे भावविश्व मांडले. मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाचा अद्भुत संगम त्यांच्या विचारसरणीत होता,” असे उद्गार डॉ. सतीश तराळ यांनी काढले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) अमरावती जिल्हा व शहर शाखेच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव व पाक्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राधानगर येथील गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि विचारमंथनात्मक वातावरणात पार पडला.
सभेत अंनिसच्या राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संघटनात्मक वाढ, काळी जादू प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी आणि बुवाबाजी विरोधी संघर्षावर चर्चा करण्यात आली.
यावेळी दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे “तुकडोजी महाराज आणि अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या सभेला अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण तडस, नरेंद्र धर्माळे, विजय डवरे, सचिन खोब्रागडे, दिगंबर मेश्राम, सचिन वासनिक, पल्लवी ढोले, बबिता वानखडे, राहुल खंडारे आणि प्रवीण वासनिक यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संपर्क आशिष देशमुख यांनी साधला, संचालन दिलीप लाडे यांनी केले, तर आभार पल्लवी ढोले यांनी मानले. सभेच्या शेवटी वाशीम जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

