Home सिंधुदुर्ग एकजुटीने कोकणाचा एल्गार! परीट-धोबी समाजाचे राज्य संघटनेतून बाहेर पडत नवे पर्व.

एकजुटीने कोकणाचा एल्गार! परीट-धोबी समाजाचे राज्य संघटनेतून बाहेर पडत नवे पर्व.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; शांतारामभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली नवी कार्यकारिणी जाहीर.(मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
0 comments

कोकणचा स्वाभिमान दुखावल्याने ऐतिहासिक निर्णय: परीट-धोबी सेवा मंडळाची स्वतंत्र प्रादेशिक संघटना स्थापन, शांतारामभाऊ कदम अध्यक्षपदी!(मॅक्स मंथन डेली न्यूज)

चिपळूण येथे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; राज्य संघटनेशी कोणतीही बांधिलकी न ठेवण्याचा एकमताने ठराव.

चिपळूण, ११ जून २०२५: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि संघटनात्मक वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीत कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सातत्याने सापत्न वागणूक मिळत असल्याने, कोकणचा स्वाभिमान दुखावला जात असल्याचा गंभीर आरोप करत तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे राज्य कार्यकारिणीशी कोणतीही बांधिलकी न ठेवण्याचा एकमताने ठराव आज चिपळूण येथे झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला.

एवढेच नव्हे, तर यावेळी “कोकण प्रदेश संत गाडगेबाबा परीट-धोबी सेवा मंडळ” या स्वतंत्र संघटनेची स्थापना करण्यात आली असून, कोकणचे ज्येष्ठ नेते शांतारामभाऊ कदम यांची सर्वानुमते प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


चिपळूण येथील मंथन आणि सामूहिक राजीनाम्यांचे शस्त्र

चिपळूण येथे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ज्येष्ठ नेते शांतारामभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत रत्नागिरी जिल्हा नेते दत्ताराम आबा महाडिक, कोकण विभाग अध्यक्ष नंदकुमार राक्षे, सिंधुदुर्ग अध्यक्ष दिलीप भालेकर, सचिव अनिल शिवडावकर, रायगड अध्यक्ष विलास तळेकर असे अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपक म. कदम यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर कार्याध्यक्ष सुभाष कदम यांनी प्रास्ताविक करताना राज्य संघटनेकडून कोकणावर होत असलेल्या अन्यायाचा सविस्तर पाढा वाचला. यानंतर नंदकुमार राक्षे, दिलीप भालेकर, दीपक कदम, शांतारामभाऊ कदम, कोकण कार्याध्यक्ष अनिल सुर्वे, मनोहर राऊत, विलास साळस्कर, प्रदेश सहसचिव रवींद्र कान्हेकर, राजेंद्र भालेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पवार, सल्लागार संतोष कदम, वसंत पिंपळकर यांसारख्या अनेक नेत्यांनी आपली मते परखडपणे मांडली. सर्वांनी एकमताने राज्य संघटनेशी संपर्क न ठेवण्याचे, सामुदायिक राजीनामे देण्याचे आणि त्यांच्या कोणत्याही बैठकीला वा कार्यक्रमाला न जाण्याचे आवाहन केले, जे सर्वांनी मान्य केले. यापुढे ‘भाऊंच्या नेतृत्वाखाली कोकणाची स्वतंत्र संघटना बनवून एकजुटीने काम करू’ असा निर्धार यावेळी करण्यात आला.


नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड: कोकणच्या ताकदीचे दर्शन

या ऐतिहासिक बैठकीत “कोकण प्रदेश संत गाडगेबाबा परीट-धोबी सेवा मंडळाची” नवीन कार्यकारिणी एकमताने मंजूर करण्यात आली, ज्यामध्ये अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा समन्वय साधण्यात आला आहे:

  • प्रदेश अध्यक्ष: शांताराम भाऊ कदम
  • उपाध्यक्ष: दिलीप भालेकर, दीपक कदम
  • महासचिव: सुभाष कदम
  • खजिनदार: नंदकुमार राक्षे
  • प्रसिद्धी प्रमुख: रवींद्र कान्हेकर
  • सदस्य: प्रकाश पवार, वसंत पिंपळकर, नागेश कुडाळकर

सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कोकणातील परीट समाजासाठी स्वतंत्र ताकद निर्माण करण्याचा निर्धार

बैठकीला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष भाऊ कदम, कोकण अध्यक्ष नंदकुमार राक्षे, कार्याध्यक्ष अनिल सुर्वे, रायगड जिल्हाध्यक्ष विलास तळेकर, उपाध्यक्ष दीपक ग. कदम, संजय गायकवाड, माजी अध्यक्ष किशोर वास्कर, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पवार, प्रदेश सह सचिव रवींद्र कान्हेकर, दिलीप सुर्वे, एम. के. राऊत (रायगड); ज्येष्ठ नेते आबा महाडिक, सल्लागार संतोष कदम, प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, कार्याध्यक्ष सुभाष कदम, लॉंड्री जिल्हाध्यक्ष महेश भोसले, लॉंड्री कार्याध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे, न्यायिक आरक्षण जिल्हाध्यक्ष नथुराम जांभुळकर, उपाध्यक्ष वसंत पिंपळकर, सह सचिव रितेश महाडिक, माजी युवाध्यक्ष सुयोग कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष अजित पावसकर, अनंत पिंपळकर, अभिजित कदम, सल्लागार मनोज शिंदे, दीपक महाडिक, विलास महाडिक, ऋषिकेश खेडेकर (रत्नागिरी); तसेच वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सचिव अनिल शिवडावकर, राजेंद्र भालेकर, नागेश कुडाळकर, विलास साळस्कर, गुरुनाथ मडवळ (सिंधुदुर्ग) यांचा समावेश होता.

नवनिर्वाचित अध्यक्ष शांतारामभाऊ कदम यांनी आपल्या भाषणात, “सर्वानी एकदिलाने काम करून कोकणात परीट समाजाची स्वतंत्र ताकद निर्माण करूया,” असा निर्धार व्यक्त केला. शेवटी सुभाष कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा निर्णय कोकणातील परीट-धोबी समाजासाठी एक नवा अध्याय सुरू करणारा असून, त्यांच्या विकासासाठी आणि हक्कांसाठी ही नवीन संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!