पिंपरी-चिंचवड शहराचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील ‘असंवेदनशील’!
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पिंपरी-चिंचवडच्या तरुणाच्या कुटुंबीयांची साधी भेटही नाही; जनतेत तीव्र संतापाच्या भावना!
पिंपरी, १४ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी अपघातात पिंपरी-चिंचवड शहरातील एक होतकरू तरुण, २२ वर्षीय इरफान शेख यांचा अपघाती मृत्यू झाला. इरफान हा पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव क्रू मेंबर होता, ज्याचा या दुर्घटनेत बळी गेला. मात्र, या घटनेनंतर प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने, विशेषतः महानगरपालिकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी, इरफानच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले नाही, त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाच्या भावना निर्माण झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या सुपुत्राच्या मृत्यूने शहर शोकाकुल; पण आयुक्तांना साधी भेटायलाही वेळ नाही!
संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असलेल्या इरफान शेख यांच्या निधनाने माहेश्वरी कुटुंब आणि त्यांच्या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा कठीण प्रसंगात प्रशासनाने नैतिक जबाबदारीने पुढे येऊन कुटुंबीयांना आधार देणे अपेक्षित होते. मात्र, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या असंवेदनशील कारभारावर आता नागरिकांकडून जोरदार टीका होत आहे.
केंद्र आणि राज्याचे नेते पोहोचले, मग ‘प्रथम नागरिक’ कुठे? असंवेदनशीलतेचा आरोप!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशाचे गृहमंत्री, प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वतः अहमदाबादला जाऊन अपघातग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करताना दिसले. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नसल्यामुळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे आहे. म्हणजेच, ते आज रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक म्हणून भूमिका बजावत आहेत. असे असतानाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहेत, असा थेट आरोप नागरिक करत आहेत.
आयुक्तांवर ‘भेदभावा’चा गंभीर आरोप: ठेकेदार-बिल्डर्सना वेळ, शोकाकुल कुटुंबाला नाही?
नागरिकांनी आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत की, त्यांना ठेकेदार आणि बिल्डर यांना भेटण्यासाठी वेळ आहे. तसेच, एका निकटवर्तीयाच्या फ्लॅटच्या वास्तुशांतीसाठी ते दीड तास जाऊन त्यांच्या घरी बसतात, यासाठी सुद्धा त्यांना वेळ आहे. परंतु, एक २२ वर्षीय तरुण मुलगा शहरातून अपघातात मरण पावला असताना, सामाजिक भान म्हणून दुर्घटनेसंदर्भात कळाल्या कळाल्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणं गरजेचं होतं, पण तेवढीही संवेदनशीलता या आयुक्तांना नाही, असे नागरिक तीव्र शब्दात बोलत आहेत. शासनाचे अधिकारी म्हणून त्यांचे कर्तव्य आहे की, अशा स्थितीत त्यांनी त्वरित मृताच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी.
प्रशासकीय कर्तव्य आणि सामाजिक भान विसरलेल्या या असंवेदनशील कारभारावर जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.