जीव धोक्यात, तरीही प्रशासन सुस्त! पिंपरी-चिंचवड मनपा उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे पूरणनगरमधील रहिवासी ‘डेथ ट्रॅप’मध्ये!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २१ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्मार्ट आणि सुरक्षित’ बनवण्याच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा आणखी एक संतापजनक आणि बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील पुर्णा नगर परिसरातील नागरिकांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतानाही, मनपाचा उद्यान विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. पूरणनगरमधील ‘राजदीप अपार्टमेंट’ आणि ‘गुरुप्रसाद अपार्टमेंट’ या सोसायट्यांच्या परिसरात असलेली अत्यंत धोकादायक, वाळलेली झाडे तात्काळ हटवावीत म्हणून रहिवाशांनी लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने जोरदार वाऱ्यामुळे ही वाळलेली झाडे कधीही निष्पाप नागरिकांच्या अंगावर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीषण शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर नागरी समस्येविरुद्ध येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जाधव यांनी प्रशासनाविरोधात आता थेट रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
हा अत्यंत गंभीर प्रकार जुन्या आरटीओ ऑफिसच्या मागे, सीडीसी (CDC) आणि के.एस.बी. (KSB) चौक परिसरात घडत आहे. येथील राजदीप आणि गुरुप्रसाद अपार्टमेंटच्या सीमाभागात अनेक जुनी झाडे पूर्णपणे वाळून गेली आहेत. या झाडांच्या अवाढव्य फांद्या अत्यंत कमकुवत झाल्या आहेत.
या संदर्भात जागरूक नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे रीतसर ऑनलाइन तक्रार देखील नोंदवली होती. विशेष म्हणजे, नागरिकांनी दिलेल्या तक्रार अर्जावर महापालिकेच्या उद्यान विभागाच्या लिपिकाचा अधिकृत स्वाक्षरी आणि आवक शिक्का देखील आहे. असे असतानाही उद्यान विभागाने अद्याप साधी पाहणी करण्याची तसदीही घेतलेली नाही. या ढिम्म कारभारामुळे रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
ऐन पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या सुकलेल्या फांद्या कोसळणे अत्यंत नित्याचे झाले आहे. यापूर्वीही या परिसरात झाडाची मोठी फांदी अचानक कोसळल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते, सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, तरीही सुस्तावलेल्या उद्यान विभागाला जाग आलेली नाही.
स्थानिक नागरिकांनी आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे संबंधित उद्यान निरीक्षक वसावे साहेब यांना या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वसावे साहेबांनी नागरिकांच्या फोनला केराची टोपली दाखवत कोणतीही दखल घेतली नाही. कर्तव्यात कसुरी करणाऱ्या वसावे साहेबांच्या या अत्यंत बेजबाबदार आणि आडमुठ्या भूमिकेबद्दल राजदीप आणि गुरुप्रसाद अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांनी त्यांचा जाहीर आणि तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
या गंभीर नागरी प्रश्नावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जाधव यांनी मनपा प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. त्या म्हणाल्या:
“मनपा प्रशासनाला नागरिकांच्या जिवापेक्षा कार्यालयातील कागदी घोडे नाचवण्यात जास्त रस आहे का? एखादे वाळलेले झाड गरिबांच्या किंवा लहान मुलांच्या अंगावर कोसळून कोणाचा नाहक बळी गेल्यावरच या उद्यान विभागाला जाग येणार आहे का? जर पूरणनगरमध्ये कोणतीही दुर्दैवी दुर्घटना घडली, तर त्याला थेट जबाबदार धरून संबंधित उद्यान अधिकारी आणि मनपा आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. आम्ही प्रशासनाला शेवटचा इशारा देत आहोत; २४ तासांच्या आत जर या धोकादायक वाळलेल्या झाडांची शास्त्रोक्त छाटणी करून परिसर सुरक्षित केला नाही, तर स्थानिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेच्या दारात उग्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन छेडले जाईल.”
आगामी मान्सूनच्या जोरदार पावसात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी आणि रहिवाशांना सुरक्षित जीवन मिळवून देण्यासाठी आता मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून कारवाईचे आदेश देणार का? याकडे संपूर्ण पुर्णा नगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

