मूर्तिजापूरमध्ये ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे ‘शेतकरी’ आंदोलन: विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन!
‘खत-बियाणे तुटवडा ते पिकविमा प्रलंबित’; शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पैसे जमा करण्याची मागणी, ‘शेतकरी कर्जमुक्त व्हावा’ – शिवसेनेचा एल्गार! प्रतिनिधी : विलास सावळे

मूर्तिजापूर,प्रतिनिधी : विलास सावळे दि. २८ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. उपनेते तथा आमदार नितीन बापू देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि तालुकाप्रमुख गजानन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अरविंद तायडे, शहराध्यक्ष विनायक गुल्हाणे, उप तालुकाप्रमुख बंडू पाटील जाडे आणि उप तालुका प्रमुख छबीले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या
निवेदनात शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर समस्या मांडण्यात आल्या:
- प्रलंबित मदत निधी: मूर्तिजापूर तालुक्यातील काही मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असले, तरी निंबा, कुरुम, हातगाव आणि जामठी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झाले नाहीत. यामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
- खत-बियाणे तुटवडा: सध्या शेत पेरणीचे दिवस सुरू असताना बाजारपेठेत खत आणि बियाणे यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले खत-बियाणे मिळत नसल्यामुळे पेरणीच्या कामात अडथळे येत आहेत. दरवर्षी पेरणीच्या सुरुवातीलाच हा तुटवडा का येतो, असा प्रश्नही निवेदनातून विचारण्यात आला.
- मागील वर्षाचा पिकविमा: मागील वर्षाचा पिकविमा देखील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत जमा झालेला नाही.
- शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आणि कर्जबाजारीपणा: शेतकऱ्यांना सातत्याने दुर्लक्षित केले जात असल्यामुळे ते कर्जबाजारी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतकरी कर्जमुक्त व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते
यावेळी गजानन चौधरी, विनायक गुल्हाने, अक्षय म्हसाये, सचिन तांबडे, अमोल तांबडे, राजू म्हसाये, बाळू पाटील राऊत, बाळासाहेब खांडेकर, संतोष, निलेश अडतकर, फिरोज भाई चाऊस, अतुल ढोरे, बाळू राऊत, गणेश धनोरकर, अमर ठाकरे, जलाल दिन शेख, गजानन देवतळे, मंगेश बाहेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी मंडळी उपस्थित होती.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शेतकऱ्यांच्या या समस्यांवर तातडीने लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
