पिंपरी-चिंचवड ‘रंगानुभूति’ महोत्सव बनू शकतो आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव!
नागरिकांच्या कलेच्या आवडीला उत्तम प्रतिसाद; ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांचे मत
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले २२ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘रंगानुभूति: नाट्य प्रयोगकला महोत्सव’ केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण करू शकतो, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी व्यक्त केले. या महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलताना आळेकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या उत्कृष्ट नाट्यगृहांमुळे आणि येथील रसिकांच्या वाढत्या प्रतिसादावरून असे वाटते की, हा महोत्सव केरळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाप्रमाणेच मोठा होऊ शकतो.
‘रंगानुभूति: सन्मान’ प्रा. समर नखाते यांना प्रदान
या महोत्सवात एफटीआयआयचे माजी विभागप्रमुख प्रा. समर नखाते यांना ‘रंगानुभूति: सन्मान’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. सत्काराला उत्तर देताना प्रा. नखाते म्हणाले की, कला ही माणसाला तोल सांभाळायला शिकवते आणि माणुसकीची संवेदना अधिक व्यापक करते. नाटक ही प्रयोगशील कला आहे, आणि कलाकार व प्रेक्षक एकत्र आल्यावरच ‘रंगानुभूति’चा प्रत्यय येतो. या महोत्सवामुळे महाराष्ट्र आणि देशातील अन्य भागांतून आलेल्या कलावंतांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली, ज्यामुळे कलाविश्व अधिक समृद्ध होण्यास मदत होईल.
कलांचा संगम आणि विविध कार्यक्रम
तीन दिवसांच्या या महोत्सवात देशाच्या विविध भागांतील कलावंतांनी आपली कला सादर केली. यामध्ये ‘पैस करंडक’ अंतर्गत नाट्यछटा, एकपात्री अभिनय, मूकनाट्य, लघुनाटिका अशा स्पर्धांबरोबरच विविध प्रांतातील लोककला आणि एकलनाट्ये सादर करण्यात आली. ‘माया’ ही राजस्थानची कावड कथा आणि चित्रकला प्रदर्शन हेही रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. हा महोत्सव कलावंतांना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या कलेचे आदानप्रदान करण्याची संधी देऊन गेला, असे प्रभाकर पवार म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बावा तेजस्विनी गांधी कुलकर्णी यांनी केले. आभार अमृता ओंबळे यांनी मानले. दरम्यान सकाळच्या सत्रात फिजिकल थिएटर कार्यशाळा, दुपारी हिंदी नाटक ‘माया’ हे कावड कथा या रचनेतून सादर करण्यात आले. त्यानंतर लेखिका व अभिनेत्री वंदना घांगुर्डे यांची श्रीकांत चौगुले यांनी प्रकट मुलाखत घेतली.
महोत्सवाच्या उत्तररंगात सतीश आळेकर लिखित आणि सुव्रत जोशी व गिरीजा ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ठकीशी संवाद’ या नाटकाच्या सादरीकरणाने आणि त्यानंतर झालेल्या विस्तृत चर्चेने या महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


