जनसंवादात ‘जनआक्रोश’: अजितदादांसमोर तक्रारींचा पाऊस
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट आणि अनागोंदी कारभारावर शहरवासीयांचा संताप
पिंपरी , प्रतिनिधी शाम सोनवणे, २४ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा करत ‘जनसंवाद’ साधला. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या दौऱ्यात, त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. या वेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्यासमोर आपल्या तक्रारींचा पाऊस पाडला. यामुळे ‘जनसंवादा’तून शहरातील प्रशासकीय कारभाराविरोधात असलेला ‘जनआक्रोश’ स्पष्टपणे दिसून आला.

प्रशासकीय कारभारावर गंभीर आरोप
अजित पवार यांच्या भेटीदरम्यान ‘रागा पॅलेस’ येथे झालेल्या जनसंवाद कार्यक्रमात चार हजारांहून अधिक तक्रारी अर्ज सादर करण्यात आले. या तक्रारींमध्ये प्रामुख्याने महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असून, आयुक्त शेखरसिंह यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला.
या तक्रारींनुसार, अधिकारी नागरिकांना किंवा लोकप्रतिनिधींना भेटत नाहीत, सर्वसामान्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करतात आणि केवळ व्यावसायिक कामांना प्राधान्य देतात. शहरातील विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असून, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने महापालिकेची अब्जावधी रुपयांची लूट चालवली असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

शहराच्या मूलभूत समस्या कायम
नागरिकांच्या तक्रारींमध्ये शहरातील विविध मूलभूत समस्यांचा समावेश होता. यामध्ये सिमेंटच्या रस्त्यांवरही पडलेले जीवघेणे खड्डे, दूषित पाणीपुरवठा आणि अपुरा पाणीपुरवठा यांसारख्या समस्या प्रामुख्याने नमूद करण्यात आल्या. तसेच, ‘स्वच्छ आणि सुंदर’ शहराच्या नावाखाली आरोग्यविषयक समस्या, भटक्या जनावरांचा सुळसुळाट आणि नद्यांचे वाढते प्रदूषण यावरही नागरिकांनी चिंता व्यक्त केली. यामध्ये पक्षविरोधी नेते आणि टोकाची गटबाजी, पाडापाडीचे राजकारण , स्टंटबाजी नको, ठोस कृती हवी, यातील दोषींवर कारवाई करण्याची धमक अजितदादांनी दाखवावी. अजितदादांच्या याच सत्ताकाळात ‘विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार’ हे सूत्र राबवत त्यांच्या बगलबच्च्यांनी प्रचंड ऊतमात केला. ठरावीक मंडळीच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारामुळे राष्ट्रवादीचा डोलारा कोसळला.
गेल्या काही वर्षांपासून ‘नदी सुधार’ प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही नद्यांची स्थिती खराब असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणले. शहराच्या विकासाऐवजी वाटोळे झाल्याचे अनेक दाखले दिले गेले.

अजित पवारांसमोरील आव्हान
२०१७ आणि २०१९ च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये मिळालेल्या पराभवानंतर, अजित पवार आता पुन्हा शहरात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘जनसंवाद’ हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. मात्र, नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, हा केवळ निवडणुकीपूर्वीचा दिखावा नसावा. गेल्या साडेतीन वर्षांतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे हेच या जनसंवादाचे खरे फलित ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
