लातूर हादरले! किरकोळ वादातून महाविद्यालयात विद्यार्थ्याची चाकू खुपसून हत्या; तिघे गंभीर जखमी तर ४ आरोपींना अटक
लातूर, १७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
लातूर : शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या लातूर शहरात सोमवारी संध्याकाळी एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. औसा रोडवरील एका महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एका विद्यार्थ्याचा बळी गेला असून अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महाविद्यालयात डिप्लोमाच्या (Diploma) तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वैयक्तिक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका गटाने धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. विक्रम नारायण पांचाळ (वय २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विक्रम हा तिथून जात असताना या वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि त्याला चाकू खुपसून ठार मारण्यात आले.
या हाणामारीत अन्य तीन विद्यार्थी देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत या प्रकरणी संशयित चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
या घटनेनंतर लातूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर पोलिसांनी तातडीने आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शैक्षणिक परिसरात अशा घटना घडणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पोलिस सध्या या घटनेमागचे नेमके कारण काय होते आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा सखोल तपास करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
