“राम नाम जपणा, पराया माल अपना” हेच भाजपचे धोरण; अयोध्येतील मंदिर लुटीविरोधात शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे ‘सत्याग्रह’ आंदोलन! शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बनसोडेंचा पहिलाच धडाका, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , ११ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदाची धुरा अत्यंत कार्यक्षमतेने हाती घेतल्यानंतर, नवनियुक्त शहराध्यक्ष श्री. नरेंद्र बनसोडे यांनी आपल्या पहिल्याच जाहीर आंदोलनातून महापालिकेसह संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड धडाका उडवून दिला आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या तिजोरीतून झालेल्या कथित संघटित दरोडा आणि निधी लुटीच्या प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे. याचाच एक भाग म्हणून, चिंचवड येथे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अत्यंत प्रभावीपणे ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन’ करण्यात आले.
शहराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचे हे पहिलेच मोठे जनआंदोलन असल्याने नरेंद्र बनसोडे यांनी संपूर्ण शहरातील काँग्रेसच्या विविध आघाड्या आणि कार्यकर्त्यांना एकाच मंचावर आणून पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या या आक्रमक आणि यशस्वी संघटन कौशल्यामुळे शहरात काँग्रेस पक्षाला एक नवा, तरुण आणि लढवय्या चेहरा मिळाल्याची चर्चा सुरू झाली असून, बनसोडे यांची राजकीय प्रतिमा अधिक उंचावली आहे.
चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाखालील श्री. राम, श्री. हनुमान, श्री. महादेव आणि शनी मंदिर संयुक्त संस्थान या पवित्र ठिकाणी आज शहर काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात सर्व देवतांचे सामूहिक पूजन करून झाली. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी ‘रघुपती राघव राजाराम’ या सामूहिक भजन गायनाने आणि ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थना गीताने संपूर्ण परिसर राष्ट्रवादाच्या आणि सत्याग्रहाच्या सुरांनी भारावून टाकला.
आंदोलनाचे नेतृत्व करताना शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी भाजप आणि संबंधित यंत्रणेवर अत्यंत धारदार शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले,
” ‘कसम राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देऊन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रदीर्घ काळ देशात राजकारण केले. मात्र, आज तीच भाजप मंदिर लुटीपर्यंत घसरली आहे. रामाच्या नावाने केवळ सत्ता मिळवायची आणि सत्तेत आल्यावर देवतेचीच लूट करून स्वतःचे खिसे भरायचे, हाच भाजपचा खरा उद्देश या घोटाळ्यातून सिद्ध झाला आहे. ४० दिवसांत सातत्याने ७० वेळा दरोडे पडत असताना तिथे ट्रस्टमध्ये असणारे भाजप व संघाचे लोक काय करत होते? का त्यांचाही यात थेट सहभाग आहे? ‘चोरी और ऊपर से सीनाजोरी’ असा हा संतापजनक प्रकार असून, या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष चौकशी होऊन चोरांना कडक शासन झालेच पाहिजे!”
नरेंद्र बनसोडे यांनी अत्यंत आक्रमकपणे मांडलेल्या या भूमिकेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश पाहायला मिळाला.
याप्रसंगी बोलताना प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी भाजपच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ” ‘राम नाम जपणा, पराया माल अपना’ हेच भाजपचे मूळ धोरण राहिले आहे. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर ट्रस्टच्या ४० दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ७० वेळा देणगी व निधीची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरीची चौकशी करण्याची मागणी करणे म्हणजे हिंदूंची किंवा मंदिराची बदनामी नाही, तर रामाप्रती आस्था असलेल्या कोट्यवधी भाविकांच्या भावनांप्रती आमचे कर्तव्य आहे. लाखो भाविकांच्या विश्वासाला कंत्राटदारांनी आणि ट्रस्टने खुंटीला टांगले असून, यावर देशाच्या पंतप्रधानांचे मौन असणे हा मुजोरीचा कळस आहे.”
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत बी. आर. माडगूळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना, “हिंदू हिताची बात करणारे लोक आता हिंदू अहिताची कृती करत आहेत. ‘मुह मे राम और बगल मे छुरी’ या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळेच मंदिराच्या तिजोऱ्या लुटल्या जात आहेत,” असा टोला लगावला.
नवनियुक्त शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या या पहिल्याच आंदोलनाला शहरातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते तरुण कार्यकर्त्यांपर्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, हिराचंद जाधव, अभिमन्यू दहीतुले, राहुल शिंपले, जितेंद्र छाबडा यांनीही आपली मनोगते व्यक्त करून बनसोडे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला.
याप्रसंगी एन एस यु आय (NSUI) चे नेते अक्षय कांबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, माजी नगरसेवक रामचंद्र माने, सेवादलाचे ज्येष्ठ नेते अशोक मंगल, पुणे जिल्हा सेवादल कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, सेवादलाचे माजी अध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, काँग्रेसचे माजी सरचिटणीस हरीश डोळस, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, सुरज गायकवाड, रोहित भाट, कबीर मोहम्मद, संदीप शिंदे, संदेश जगताप, नासिर चौधरी, भास्कर नारखेडे, गुंगा शिरसागर, विल्यम साळवी, दीपक भंडारी, विलास सकट, नितीन सोनवणे, रितिका शर्मा, प्रवीण कांबळे, सुरज कोथिंबीरे, देवदत्त रानवडे, अलोक लाड, विवेक विधाते, सिल्वराज अँथोनी, साहेबराव खरात आदींसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिलेच आंदोलन प्रचंड यशस्वी करून नरेंद्र बनसोडे यांनी आगामी काळातील काँग्रेसच्या आक्रमक वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


