पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेचा एल्गार! अळीनाशक आणि धूर फवारणीचा धडाका; निरोगी आरोग्यासाठी आयुक्त-महापौरांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर जलजन्य व संसर्गजन्य आजारांचा वाढता संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे आणि जिविताचे संरक्षण करण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वच्छता, जनजागृती आणि डास नियंत्रण मोहिमेवर विशेष भर दिला असून संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत जागोजागी साचलेले पाणी, अस्वच्छ परिसर आणि दूषित अन्न-पाण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार वेगाने होण्याची भीती असते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत.शहराच्या विविध भागांत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित अळीनाशक औषधांची फवारणी आणि धूर फवारणी (Fogging) करण्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत संशयास्पद भागांत घरोघरी जाऊन सर्वेक्षण आणि जनजागृती मोहीम राबवली जात आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आणि आरोग्य केंद्रांमध्ये संशयित रुग्णांची त्वरित तपासणी व मोफत उपचारांची चोख सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या या व्यापक मोहिमेबाबत बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांचे सक्रिय सहकार्य लाभणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या घर व परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ताप, तीव्र अंगदुखी, उलट्या किंवा जुलाब यांसारखी कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास स्वतःच्या मनाने औषधोपचार न करता, विलंब न लावता जवळच्या महापालिका आरोग्य केंद्रात जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.”
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वच्छतेबाबत कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका दुपटीने वाढतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य दिले पाहिजे. पाण्याच्या टाक्या, कुलर, फुलदाण्या आणि घरात किंवा घराबाहेर असणारे जुने टायर यांसारख्या पाणी साचणाऱ्या वस्तूंची नियमित स्वच्छता करावी. नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा आणि पाणी साचू देऊ नये.”
तसेच, आरोग्य विभागाचे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी स्पष्ट केले की, डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करणे गरजेचे आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरभर प्रतिबंधात्मक उपाय सातत्याने राबविण्यात येत असून नागरिकांच्या सहभागामुळेच निरोगी आणि स्वच्छ पिंपरी-चिंचवडचे उद्दिष्ट साध्य होईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


