अमरावती जिल्ह्यात १२५ नवीन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवले; १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी!
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. १ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये १२५ नवीन रास्तभाव (रेशन) दुकानांना मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पात्र संस्था, बचत गट आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अर्ज मागवण्यात आले आहेत.
नवीन रास्तभाव दुकान मंजुरीसाठी शासनाच्या नियमांनुसार संस्था व गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं साहाय्यता बचत गट (SHG), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था किंवा नोंदणीकृत न्यास (Trust), मंजूर करण्यात आलेल्या रास्तभाव दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदाय व गटाद्वारे करणे आवश्यक राहील.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली (मक्रंदाबाद, मक्रमपूर, उदापूर इ.), तिवसा, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, मोर्शी, धारणी, अमरावती (ग्रामीण), चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तालुक्यांतील विविध गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.
-
अर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित तहसील कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.
-
अर्जाचे शुल्क: रु. १०० (चलनाद्वारे भरणा करूनही अर्ज प्राप्त करता येईल).
-
अंतिम मुदत: १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत.
१५ ऑगस्टनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी दिली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
