30
‘दिशा’ समितीच्या बैठकीत महापौर रवि लांडगे यांचा धडाका! चाकण-निगडी मेट्रो आळंदीला जोडण्यासह इंद्रायणी प्रदूषण मुक्तीची आग्रही मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०९ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / पुणे: पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण, शाश्वत आणि गतिमान विकासासाठी महापदाची सूत्रे हाती घेतल्यापासून महापौर रवि लांडगे हे अहोरात्र ॲक्शन मोडवर काम करत आहेत. याच धडाकेबाज कार्यपद्धतीचा परिचय पुन्हा एकदा पुणे येथे पार पडलेल्या ‘जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण’ (दिशा) समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत पाहायला मिळाला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महापौर रवि लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडच्या पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक, नदी प्रदूषण आणि शाश्वत पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न अत्यंत ठामपणे व प्राधान्याने मांडले.

चाकण-निगडी या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेत तीर्थक्षेत्र आळंदीचा समावेश करण्यात यावा, अशी ऐतिहासिक आणि दूरदृष्टी असणारी मागणी महापौर लांडगे यांनी केली. आळंदीचे धार्मिक-ऐतिहासिक महत्त्व आणि दरवर्षी येणाऱ्या लाखो भाविकांची संख्या लक्षात घेता मेट्रो सुविधा आळंदीपर्यंत वाढवणे काळाची गरज आहे.
भक्ती शक्ती–मुकाई चौक–वाकड–नाशिक फाटा–वल्लभनगर–चाकण ही ४५.२९ किलोमीटर लांबीची प्रस्तावित मेट्रो मार्गिका ३४ स्थानकांची असणार आहे. या मार्गिकेत आळंदीचा समावेश करून केंद्र सरकारकडून आवश्यक मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशी आग्रही विनंती महापौरांनी केली.

पवित्र इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणावर महापौर रवि लांडगे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. केवळ एका प्राधिकरणावर अवलंबून न राहता नदी क्षेत्राशी संबंधित सर्व महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन संयुक्तपणे ‘कालबद्ध कृती आराखडा’ (Action Plan) तयार करावा. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि प्रदूषण नियंत्रणाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, असा दबाव त्यांनी बैठकीत निर्माण केला.
शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पातील सर्व प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यासाठी सर्व घटकांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, AMRUT 2.0, स्मार्ट सिटी मिशन, पीएम स्वनिधी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा आणि राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा (NCAP) थेट लाभ शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका प्रशासनाला गती देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
महापौर रवि लांडगे यांनी ज्या आक्रमकतेने आणि अभ्यासू वृत्तीने पिंपरी-चिंचवडचे प्रश्न मांडले, त्याची तत्परतेने दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार हेमंत रासने, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर यांच्यासह विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडे थेट थेट पाठपुरावा करून प्रश्न तडीस नेण्याच्या महापौर रवि लांडगे यांच्या या धडाडीच्या कामगिरीमुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाची प्रतिमा अधिकच उंचावली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
