पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात सुजाता नखाते यांचा एल्गार! कठोर कायद्यांसाठी अंबादास दानवेंना निवेदन!
चिंचवड विधानसभा विभाग संघटिका सुजाता हरेश नखाते यांनी हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या अमानवीय कृत्यांना आळा घालण्यासाठी विधिमंडळात तातडीने कडक आणि प्रभावी कायदे करण्याची मागणी त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात सुजाता नखाते यांनी नमूद केले आहे की, मागील काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे या युवतीच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा राज्यातील महिलांवरील कौटुंबिक अत्याचार आणि हुंडाबळीसारख्या गंभीर सामाजिक समस्यांना वाचा फोडली आहे.
हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आता समाजासाठी एक गंभीर आव्हान बनले आहे. ही अमानवीय प्रथा आणि हिंसाचार थांबवण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये त्वरित कठोर आणि प्रभावी कायदे तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतीही ढिलाई यापुढे सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट मत सुजाता नखाते यांनी व्यक्त केले आहे.
एका धक्कादायक सर्वेक्षणानुसार, केवळ महाराष्ट्रात मागील तीन वर्षांमध्ये सुमारे २० हजारांहून अधिक महिलांनी हुंडाबळी तसेच कौटुंबिक अत्याचारांमुळे आपले प्राण गमावले आहेत. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे. महिलांवरील शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अत्याचारामुळे त्यांचे मूलभूत मानवाधिकार धोक्यात येत आहेत. यामुळे समाजात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे, याकडे त्यांनी दानवेंचे लक्ष वेधले.
सुजाता नखाते यांनी मागणी केली आहे की, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची केस जलदगती न्यायालयात (फास्टट्रॅक कोर्ट) चालवून या घटनेतील दोषी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. तसेच, दुर्दैवी वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आपण विधिमंडळात प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी अंबादास दानवे यांना केले आहे.
या महत्त्वपूर्ण निवेदनावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहरप्रमुख संजोग वाघेरे, दस्तगीर भाई मनियार, रोमी संधू, हरेश आबा नखाते, संदीप भालके, युवराज कोकाटे, भावेश देशमुख, दिलीप भोंडवे, बाबासाहेब भोंडवे, मोहन बारटक्के, श्रीमंत गिरी, नितीन दर्शले, राजाराम कुदळे, किरण दळवी, गोरख पाटील, अनिता तुतारे (शिवसेना शहर संघटिका), रूपाली आल्हाट (उपशहर प्रमुख), ज्योती भालके, विभाग प्रमुख तसलीम शेख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनामुळे हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात एक मजबूत आवाज उठला असून, विधिमंडळ यावर तातडीने काय पाऊल उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायद्यांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.