पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): संत तुकाराम नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग प्रशस्त! कामगार नेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक सर्वसाधारण सभा!
पिंपरी येथील संत तुकाराम नगर गृह रचना संस्थेच्या ९४१ सदनिका आणि २२ दुकानांच्या पुनर्विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. संस्थेची सर्वसाधारण सभा कामगार नेते यशवंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, २५ मे २०२५ रोजी संत तुकाराम महाराज मंदिराच्या सभामंडपात मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला संत तुकाराम नगरातील शेकडो रहिवासी बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१९८५ साली पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने उभारलेल्या संत तुकाराम नगरात मध्यमवर्गीय श्रमिक, कामगार, छोटे उद्योजक आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या वसाहतीतील घरे आता जुनी झाली असून, ती मोडकळीस आली आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी एकत्र येऊन आपल्या हक्काच्या घरांचे पुनर्वसन करण्याचा निर्धार केला.
या सामूहिक प्रयत्नांतून संत तुकाराम नगर गृह रचना संस्थेची नोंदणीकृत स्थापना करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी कामगार नेते यशवंत भोसले यांची निवड सर्वानुमते करण्यात आली, आणि पुनर्विकासाच्या पुढील कार्यवाहीची जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीकडे सोपविण्यात आली. त्यानुसार, संस्थेने गृहनिर्माण मंडळाकडे लिज डिडसाठी आवश्यक अर्ज नुकताच सादर केला आहे. या सर्वसाधारण सभेत पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पुनर्विकासाच्या टप्प्यांबाबत सखोल मार्गदर्शन सभासद बंधू-भगिनींना करण्यात आले.
सोसायटीच्या विविध मान्यवर कार्यकारिणी सदस्यांनी यावेळी आपले विचार आणि अपेक्षा व्यक्त केल्या. आपल्या नवीन आणि आधुनिक घरांचे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याने संत तुकाराम नगरमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. संस्थेने यापूर्वीच LIG (निम्न उत्पन्न गट) साठी ९०० चौरस फूट आणि MIG (मध्यम उत्पन्न गट) साठी १२०० चौरस फुटांच्या घरांचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला यापूर्वीच्या सभेत सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.
या महत्त्वपूर्ण सभेच्या व्यासपीठावर सोसायटीचे उपाध्यक्ष ओंकार जोकारे, सरचिटणीस शंकर शितोळे, खजिनदार मानसीताई देशपांडे, कार्याध्यक्ष अंकुश वाघमारे, सहकार्याध्यक्ष दत्तात्रय धाडगे, सहचिटणीस सतीश सासवडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य मनोजची नांदे, इसमतसुलताना सय्यद, अप्पू कुट्टन नायर, फौजदार गायकवाड, सुधाकर शिंदे, विनायक निकम, सुदाम गायकवाड, मल्लेश कोरवी, संतोष चौधरी, चंद्रकांत आडवळकर, राजेंद्र पाटील, मोहन जाधव, अंकुश गायकवाड, आप्पासाहेब माने, शहनाज मौलवी, राजाराम भोंडवे, शालनताई महापुरे, शिरीष सासवडे, रावसाहेब पाबळे, योगेंद्र आरवडे, किसनजी भाग्यवंत, गणेश गुलदगड, अरुणाताई भंडारी, आरतीताई पराळे, शालनताई भंडारे, योगेश रेळेकर, दत्ता झरकर आणि लताताई पाटील यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
संत तुकाराम नगरातील रहिवासी गेल्या ४० वर्षांपासून एकत्र आहेत. येथील घरे आता जीर्ण झाली असून ती मोडकळीस आलेली आहेत. आता या घरांचे २२ मजली आधुनिक टॉवरमध्ये रूपांतर होणार असल्याने सर्वसामान्य कामगार आणि श्रमिक कुटुंबांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. हा पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी संस्था आणि सर्व सभासद एकजुटीने प्रयत्नशील आहेत. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला सर्वांच्या शुभेच्छा मिळाव्यात, अशी विनंती अध्यक्षांनी शेवटी केली.