औरंगाबाद (मॅक्स मंथन डेली न्यूज): संजय शिरसाटांच्या लेकावर गंभीर आरोप! विवाहित महिलेसोबत लग्न, शारीरिक संबंध आणि धोका! राजकीय वर्तुळात खळबळ!
राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. महायुती सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धांतने आपल्याला धमकावून आणि बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा, तसेच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
या महिलेने केलेल्या आरोपांनुसार, २०१८ मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत आणि तिची ओळख झाली. काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचे संबंध अधिक घट्ट झाले. चेंबूरमधील एका फ्लॅटवर दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले, ज्यामुळे ती गर्भवती झाली. मात्र, सिद्धांतने जबरदस्तीने गर्भपात करवला, असा आरोप महिलेने केला आहे.
सिद्धांतने वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला. त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला आणि १४ जानेवारी २०२२ रोजी बौद्ध पद्धतीने लग्न केले. लग्नाचे पुरावेही महिलेकडे आहेत, असे तिने म्हटले आहे.
मात्र, लग्नानंतर सिद्धांतच्या वागणुकीत अचानक बदल झाला. त्याने तिला चेंबूरमध्येच राहण्यास सांगून औरंगाबादला नेण्यास नकार दिला. सिद्धांतचे इतर महिलांशी असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. “पोलिसांकडे गेल्यास आत्महत्या करेन आणि तुझे कुटुंब उद्ध्वस्त करेन,” अशा स्वरूपाच्या धमक्या त्याने दिल्या, असे महिलेने म्हटले आहे.
२० डिसेंबर २०२४ रोजी महिलेने शाहूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, संजय शिरसाट मंत्री असल्यामुळे पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा आरोप महिलेच्या वकिलांनी केला आहे. सात दिवसांच्या आत न्याय न मिळाल्यास महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे.
महिलेच्या वकिलांनी संजय शिरसाट यांच्यावर पोलिसांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी पोलिसांवर दबाव टाकून कारवाई होऊ दिली नाही, असा आरोप महिलेच्या वकिलांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि पीडित महिलेला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.