कामगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मैदानात! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)
कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी जयंतराव पाटील यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या मांडल्या.
पिंपरी, २ जून २०२५: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता राज्यातील कामगारांच्या हक्कांसाठी अधिक सक्रिय झाला आहे. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची भेट घेऊन राज्यातील कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा केली.
या भेटीदरम्यान, नखाते यांनी जयंतराव पाटील यांना सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर, कार्यकर्त्यांना अधिक ऊर्जा देण्यासाठी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करावे. तसेच, राज्यातील कष्टकरी, असंघटित आणि कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या श्रमसंहितांमुळे कामगारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या असुरक्षिततेबरोबरच वेतनवाढ थांबली आहे. अनेक कामगारांना नियमित सेवेत घेण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने दीर्घकाळ काम करायला लावले जाते. आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी, अपघात विमा अशा मूलभूत सुविधा त्यांना नाकारल्या जात आहेत.
पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा औद्योगिक भागांमध्ये काम करणाऱ्या लाखो असंघटित कामगारांचे जीवन अत्यंत हलाखीचे झाले आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना सुविधा नाही, आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. महिलांच्या शोषणाचा प्रश्न गंभीर असून बालमजुरीसुद्धा काही ठिकाणी वाढलेली आहे, असे नखाते यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी नखाते म्हणाले, “हे केवळ श्रमिकांचे नव्हे, तर मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. राज्यात सर्व कामगार संघटनांना एकत्र आणून आपण संघर्ष करू. सर्व कामगारांच्या माध्यमातून एक सशक्त आंदोलन उभं करण्याची गरज आहे.”
जयंतराव पाटील यांनी नखाते यांना आश्वासन दिले की, “कामगारांच्या हक्कासाठी असलेले काम सुरू ठेवा, त्यांच्या न्याय हक्कांसाठी पक्ष आपल्यासोबत राहील. आगामी काळात पिंपरी-चिंचवड, पुणे व अन्य ठिकाणी तसेच राज्यस्तरावर कामगारांच्या प्रश्नांवर विशेष बैठकींचे आयोजन करण्यात येईल. राज्यातील कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कटिबद्ध आहे.”
या बैठकीत आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य किरण साडेकर, लाला राठोड आदी उपस्थित होते.