शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवण्याच्या दिशेने महायुती सरकारची वाटचाल: रविकांत तुपकरांचा रणशिंग फुंकत घणाघाती हल्लाबोल!(मॅक्स मंथन डेली न्यूज)
अमरावती (प्रतिनिधी, अविनाश वानखेडे) दि. ११ जून २०२५: -महाराष्ट्राच्या बळीराजावर एकामागून एक संकटे कोसळत असताना, राज्य सरकार मात्र झोपले असल्याचा गंभीर आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी मंत्री रविकांत तुपकर यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुपकर यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत, शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्वाणीचा इशारा दिला.
“शेतकरी मरणाच्या दारात, सरकारला सत्तेची घमेंड!”
तुपकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण अवस्थेने केली. “आज महाराष्ट्रातील शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे, असे खुद्द एका कॅबिनेट मंत्र्याने विधानसभेच्या सभागृहात सांगितले आहे,” या विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले, “असे असतानाही या राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे अस्तित्व आणि त्यांची चळवळ संपवण्याच्या दिशेने निघालेले आहे.” सरकारला सत्तेची घमेंड आली असून, त्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची जराही कदर नाही, असे ते म्हणाले.
“इंग्रजांपेक्षाही भयंकर दादागिरी; शत्रू नेमका कोण, हे समजेनासे झाले!”
सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत तुपकर यांनी, हे सरकार इंग्रजांपेक्षाही भयंकर दादागिरी आणि दहशतीचे काम करत असल्याचा आरोप केला. “इंग्रज किमान ओळखू येत होते, पण ही औलाद आपल्या शेजारची आहे, आपल्यासारखीच दिसते. आपल्यात आले की आपल्यासारखे बोलतात आणि तिकडे गेले की त्यांच्यासारखे बोलतात. त्यामुळे शत्रू नेमका कोण, हे आपल्याला समजेनासे झाले आहे,” अशा खरमरीत शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणावर प्रहार केला. “बळीराजा आत्महत्या करतोय, गळफास घेतोय आणि हे सरकार काही करायला तयार नाही,” ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
“रोम जळत असताना…”: सरकारवर रोमच्या राजाची उपमा
राज्याच्या सद्यस्थितीची तुलना करताना तुपकर यांनी ‘रोम’च्या जळत्या इतिहासाचे उदाहरण दिले. “रोम हा देश ज्यावेळी जळत होता, त्यावेळी रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता. तशीच या महाराष्ट्रातील सरकारची अवस्था आहे,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवघेण्या प्रश्नांवर सरकारची अनास्था आणि इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीवर त्यांनी गंभीर टीका केली. “महाराष्ट्रातील शेतकरी जळत असून सरकार मात्र, महानगरपालिका कशी हाती येईल याकडे लक्ष देत आहे,” असे सांगत, त्यांनी सरकारचे प्राधान्यक्रम चुकीचे असल्याचे ठणकावले.
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा: आशेचा किरण!
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह अन्य १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे मोझरी येथे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस असून, तुपकर यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले की, “आमचा कुणी वाली नाही, आमची बाजू मांडणारा, आमच्यासाठी कुणी बोलणारा नाही अशी भावना शेतकऱ्यांची झाली होती. मात्र, अशा परिस्थितीत बच्चू भाऊंनी आंदोलनाच्या माध्यमातून एक आशेचा किरण शेतकऱ्यांसाठी उभा केला आहे.” त्यांनी उपोषण आणि अन्नत्याग या आंदोलनाला “सर्वात कठीण” असे संबोधत, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी स्वीकारलेल्या या खडतर मार्गाचे कौतुक केले.
रविकांत तुपकर यांच्या या आक्रमक भूमिकेने आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सरकार या गंभीर आरोपांची आणि मागण्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य पावले उचलेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.