“हे सरकार अदानी-अंबानीचे!” महादेव जाणकरांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, बच्चू कडूंना पाठिंबा (मॅक्स मंथन डेली न्यूज)
ईव्हीएम घोटाळ्याने सत्तेत आल्याचा दावा; शेतकरी, वंचित, दलितांकडे दुर्लक्ष केल्यास ‘शहीद’ होण्याचा निर्वाणीचा इशारा.
मोझरी,अमरावती प्रतिनिधी अविनाश वानखेडे, १० जून २०२५: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा एक गंभीर आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. मोझरी येथे आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या जानकर यांनी, महायुती सरकार हे “अदानी-अंबानीचे सरकार” असल्याचा दावा करत जोरदार हल्लाबोल केला. “सरकारला सत्तेची घमेंड आली आहे, कारण हे सरकार ईव्हीएम घोटाळा करून सत्तेत आलेले आहे,” असा गंभीर आरोप करत, त्यांनी राज्यातील शेतकरी, वंचित, दलित आणि आदिवासी घटकांकडे दुर्लक्ष केल्यास “आम्हाला शहीद व्हायला भाग पाडू नका” असा निर्वाणीचा इशारा दिला.
सत्तेचा पश्चाताप आणि शेतकऱ्यांची माफी
आमदार बच्चू कडू यांचे ८ जूनपासून मोझरी येथे उपोषण चालू असून, आज चौथ्या दिवशी महादेव जानकर यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी भेट दिली. यावेळी बोलताना जानकर यांनी महायुतीला सत्तेत आणण्यात आपला मोठा वाटा होता, पण आता त्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगत, शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली. “महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी, दलित, ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे आणि समाजाचा निधी रस्त्यांसाठी खर्च करत आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी या सरकारला “लबाड सरकार” असे संबोधत, त्यांना सत्तेच्या बाहेर बसवण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
जाती-धर्मात भांडण आणि उद्योगपतींचे सरकार
जानकर यांनी पुढे बोलताना सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, सरकार जाणीवपूर्वक जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात भांडणे लावून शेतीमालाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मते, “हे सरकार अदानी-अंबानीचे आहे, शेतकऱ्यांचे नाही तर हे उद्योगपतींचे सरकार आहे.”
या सरकारला अद्दल घडवायची असेल, तर सर्वांनी बच्चू कडू यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन करत जानकर यांनी आपल्या पाठिंब्याचे कारण स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.