आषाढीवारीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज! अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी; वारकऱ्यांच्या सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, प्रशासनाचा निर्धार!
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासह सर्व तयारी अंतिम टप्प्यात.
पिंपरी, १३ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): विठ्ठलनामाच्या गजराने आसमंत दुमदुमणारा आषाढीवारी पालखी सोहळा लवकरच पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी १९ जून रोजी, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. या भव्य सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्णपणे सज्ज झाली असून, पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.
वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची, तसेच संपूर्ण पालखी मार्गाची स्वतः पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आणि संबंधित विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘सर्व विभागांनी वारी दरम्यान आपापसांत समन्वय राखावा’ – अतिरिक्त आयुक्त खोराटे
पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आणि विभागांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन करावे.”
यासोबतच, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यासही त्यांनी सांगितले. पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधा, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. निगडी येथील भक्ती-शक्ती येथे उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतकक्षातील व्यवस्थेची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याचीही दक्षता घेण्याबाबत सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिका वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि आषाढीवारी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कटिबद्ध असून, वारकऱ्यांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास अनुभवता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.