Home अमरावती बच्चू कडूंच्या उपोषणाने सरकारला दिला थेट ‘अंतिम इशारा’!

बच्चू कडूंच्या उपोषणाने सरकारला दिला थेट ‘अंतिम इशारा’!

प्रकृती गंभीर तरी मागण्यांवर ठाम; शेतकरी, दिव्यांग आणि युवकांच्या हक्कांसाठी 'प्रहार'चा एल्गार, राज्यभरात 'चक्काजाम'ची हाक. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
0 comments

राज्यभर पेटले आंदोलन! बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाने घेतले भीषण वळण; रक्ताची उलटी, कार्यकर्त्याची विषप्राशन, सरकारची अनास्था कायम!

शेतकरी, दिव्यांग आणि युवकांच्या मागण्यांवर बच्चू भाऊ ठाम; १५ जूनला राज्यभरात ‘चक्काजाम’चा इशारा!

परतवाडा अमरावती (प्रतिनिधी अविनाश वानखेडे), १३ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): राष्ट्रसंतांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर प्रहार संस्थापक श्री. बच्चू कडू यांनी पुकारलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाने आता अत्यंत गंभीर आणि वेगळे वळण घेतले आहे. बघता बघता हे आंदोलन राज्यभरात पेटले असून, त्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, शासनाच्या अनास्थेमुळे आज परिस्थितीने अत्यंत चिंताजनक स्वरूप धारण केले आहे.


बच्चूभाऊंना रक्ताची उलटी, कार्यकर्त्याचे विषप्राशन!

आंदोलनाचा आज सहावा दिवस असून, बच्चूभाऊंची प्रकृती कमालीची खालावली आहे. त्यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. मात्र, अशाही अवस्थेत त्यांनी कोणताही उपचार घेण्यास नकार देऊन उपोषणावर ठाम असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे त्यांचेवर प्रेम करणारी सामान्य जनता आणि कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत. एकीकडे बच्चूभाऊंची प्रकृती बिघडत असताना, शासनाकडून कुठलाही तोडगा काढायला तयार नसल्याचे पाहून, प्रहार कार्यकर्ता अजय भागवतराव चौधरी (वय ३५, रा. करजगाव, ता. वरुड) यांनी विष प्राशन केले आहे. या घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


विविध मागण्यांवर बच्चू कडू ठाम!

महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती, ती अद्यापही पूर्ण न केल्याने बच्चू कडू यांनी १६ मागण्यांसह ८ जूनपासून मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

१. दिव्यांग व विधवा महिलांना ₹६०००/- मानधन देण्यात यावे. २. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावावर २०% अनुदान मिळावे. ३. दि.०७/एप्रिल २०२५ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. ४. युवकांच्या हाताला काम द्यावे, नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे. तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्या. ५. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाकरिता समान निकष लावून किमान ₹५ लाख अनुदान लाभार्थ्यांना देण्यात यावे. ६. शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य मिळावे व स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. ७. पेरणी ते कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे CDWZ मध्ये घेण्यात यावीत, फळपिकांना ३.५ रेशो लावून दुग्ध व्यवसाय CDWZ ला जोडण्यात यावा. अन्यथा, तेलंगणाच्या धर्तीवर एकरी ₹१०,००० मदत किंवा भावाचा चढउतार निधी देण्यात यावा. ८. रासायनिक खताप्रमाणे शेणखतालाही अनुदान देण्यात यावे. ९. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे. १०. मनरेगा मधील मजुरी ₹३१२ वरून ₹५०० करण्यात यावी. ११. निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे. १२. दुधातील भेसळ रोखावी, गाईच्या दुधाला बेस रेट ₹५०/लिटर व म्हशीच्या दुधाला ₹६०/लिटर मिळावा. १३. कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान ₹४० बाजारभाव होईपर्यंत निर्यात बंदीचा निर्णय करू नये. १४. सन २०२५-२६ साठी ऊस पिकाला प्रति टन ₹४३०० दर १% रिकव्हरी बेस रेट धुरन मिळावा, पुढील ११% रिकव्हरीसाठी ₹४३० एमआरपी दर मिळावेत. प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी व १५ दिवसांत पैसे न दिल्यास व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला द्यावेत.


वाढता राजकीय, सामाजिक पाठिंबा; १५ जूनला ‘चक्काजाम’चा इशारा!

बच्चू कडूंच्या या न्याय्य लढ्याला हरियाणा येथील शेतकरी नेते राकेश टिकैत, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, आ. रोहित पाटील, आ. रोहित पवार यांच्यासह २० आमदार व ६ खासदारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शंभरपेक्षा अधिक सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला समर्थन दिले आहे.

शासनाची अनास्था पाहून, प्रहार संघटनेने आता १५ जूनला संपूर्ण राज्यात ‘चक्काजाम’ आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे. या आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही, असे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!