मूर्तिजापूरात गोवंश हत्याबंदी कायदा धाब्यावर; सार्वजनिक आरोग्य धोक्यात!
रस्त्याच्या कडेलाच कत्तलीची घाण; नागरिकांकडून ‘हा घ्या पुरावा!’ म्हणत प्रशासनावर संताप!
मूर्तिजापूर, १७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): मूर्तिजापूर शहरात गोवंश हत्याबंदी कायदा सर्रास धाब्यावर बसवून रोज गोवंशाची कत्तल होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या अवैध कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून, रस्त्याच्या कडेलाच कत्तल केलेल्या गुरांची घाण टाकली जात असल्याचा पुरावा नागरिकांनी दिला आहे. “यासाठी कोणाचे अभय आहे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर उघडपणे घाण; दुर्गंधीने नागरिक त्रस्त
येथील राष्ट्रीय महामार्गावरील आसरा फाटा परिसरात रस्त्याच्याच कडेला उघड्यावर कत्तल करण्यात आलेल्या गुरांचे खाण्यायोग्य नसलेले आणि निरुपयोगी मांस तसेच रक्त फेकले जाते. जर मूर्तिजापूर शहरात गुरांची कत्तल होत नसेल, तर हे रोज निरुपयोगी मांस कुठून येते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या कृत्यामागे कोणाचे अभय आहे, याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरदिवशी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडण्याच्या बाता मारल्या जातात, मात्र अगदी नाकावर टिच्चून शहरातच रोज शेकडो गुरांची कत्तल होत असलेले हे अघोरी कृत्य का दिसत नाही, असाही सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.
पावसाळ्यात रोगराईचा धोका; शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अगदी वर्दळीच्या रस्त्याच्याच कडेला हे मांस टाकले जात असल्याने ते कुजून त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात आजार तोंड वर काढतात. अशा कृत्यामुळे घरकुल व इतर परिसरात रोगराई झपाट्याने पसरून तेथील नागरिकांच्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र शासनाने गायीला ‘राज्यमातेचा’ दर्जा दिला असतानाही मूर्तिजापूर शहरात गोवंशाची कत्तल होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेकडे शासन, नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस, की राजकीय पुढारी कोण दुर्लक्ष करीत आहे, असाही जाब नागरिक यानिमित्ताने विचारत आहेत. अशाप्रकारे गोवंशाची कत्तल करून घाण पसरवून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, हाच यक्षप्रश्न आहे. तात्काळ यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.