दिघी येथे ‘माऊली’ंच्या पालखी सोहळ्यात ‘शिवसेना (उबाठा)’ आणि ‘वाळके प्रतिष्ठान’चा सेवेचा महायज्ञ!
५ हजार वारकऱ्यांना महाप्रसाद, शिधा आणि गरम पाण्याची सोय; परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती!
पिंपरी, दि. २० जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे आज (शुक्रवार, २० जून) लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान झाले. याच पवित्र सोहळ्यादरम्यान, आळंदी-पुणे रस्त्यावरील दिघी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि स्वर्गीय तानाजी सोपान वाळके प्रतिष्ठान यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी एका भव्य सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना महाप्रसाद, शिधा, पाण्याची बाटली आणि चहाचे वाटप करण्यात आले. ५ हजार पेक्षा जास्त वारकरी आणि भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला.
सेवाभावी उपक्रमाची वैशिष्ट्ये
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या सेवाभावी शिबिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, वारकऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. लांबच्या प्रवासाने थकलेल्या वारकऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत दिलासादायक ठरली.
याप्रसंगी परभणीचे खासदार संजय बंडू जाधव, पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख केसरीनाथ पाटील, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, उपशहर प्रमुख राहुल गवळी, शहर समन्वयक कैलास नेवासकर, दिघी विभाग प्रमुख कृष्णाभाऊ वाळके, कार्यक्रमाचे संयोजक व वाळके प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष तानाजी वाळके तसेच प्रमुख शिवसैनिक, दिघी येथील ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना वर्धापन दिनानिमित्तही वारकऱ्यांची सेवा
तत्पूर्वी बुधवारी (दि. १८ जून) बालेवाडी येथे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही स्वर्गीय तानाजी सोपान वाळके प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी विशेष सेवा करण्यात आली होती. या कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आळंदी येथील शांतीब्रह्म वारकरी गुरुकुल संस्थेस शिधा, बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ आहेर, शिवसेना शहर संघटक व वाळके प्रतिष्ठानचे संतोष तानाजी वाळके, शिवसेना दिघी विभाग प्रमुख कृष्णाभाऊ वाळके आदी उपस्थित होते.
शिवसेना (उबाठा) आणि वाळके प्रतिष्ठानने वारकरी सोहळ्यानिमित्त केलेल्या या सेवाभावी कार्याचे वारकऱ्यांनी आणि स्थानिकांनी कौतुक केले आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
