Home पिंपरी चिंचवड राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर: पिंपरी-चिंचवड मनपाकडून जयंतीनिमित्त विशेष ‘प्रबोधन पर्व’!

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर: पिंपरी-चिंचवड मनपाकडून जयंतीनिमित्त विशेष ‘प्रबोधन पर्व’!

आरक्षणाचे जनक आणि समाजसुधारकाला विनम्र अभिवादन; दोन दिवसीय कार्यक्रमांनी वातावरण भारले. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन: जयंतीनिमित्त ‘विचार प्रबोधन पर्वा’चा जागर!

 

‘आरक्षणाचे जनक’ ते ‘शिक्षणाचे प्रणेते’ – समाजसुधारकाचे कार्य प्रेरणादायी; युवकांना करिअरचे मार्गदर्शन!

 

पिंपरी, दि. २६ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): थोर समाजसुधारक, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (गुरुवार, २६ जून) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेला, तसेच केएसबी चौक चिंचवड येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यासोबतच, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यासाठी दोन दिवसीय ‘विचार प्रबोधन पर्वा’चे उद्घाटन चिंचवड येथील साई मंदिर उद्यानात करण्यात आले, ज्यात युवकांना करिअर मार्गदर्शनही लाभले.


 

महानगरपालिकेकडून अभिवादन सोहळा

 

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयोजित कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि तृप्ती सांडभोर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर मंगला कदम, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, मिलिंद वेल्हाळ, शांताराम खुडे, सुनील पाटील, विजय नाळे, जगदीश परिट, संग्राम पाटील, लहू पवार, संदीप देसाई, पी. बी. पाटील, युवराज तिकटे, बापू गायकवाड, दत्ता गायकवाड तसेच कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

केएसबी चौक, चिंचवड येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा प्रांगणात झालेल्या अभिवादन कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य मारुती भापकर, बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते धनाजी येळकर पाटील, अजिझ शेख, वैभव जाधव, बापू गायकवाड, सखाराम रेडेकर, शामराव पताडे, नामदेव शिंत्रे, प्रवीण कदम, अप्पा पाटील, अरुण गळतगे, शिवाजीराव पाटील, लक्ष्मण टकेकर, विश्वनाथ टकेकर, सुधीर पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

‘विचार प्रबोधन पर्व’: शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील साई मंदिर उद्यानात दोन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी महापौर मंगलाताई कदम, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रा. महेश निगडे, प्रा. दिलीप शेलार, शाहीर प्रकाश ढवळे, लेखक श्रीकांत चौगुले, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील, विजय नाळे, मिलिंद वेल्हाळ, जगदीश परिट, सुनील पाटील यांच्यासह कोल्हापूर मित्र मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून सांगितले की, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नव्हते, तर ते एक समाजसुधारक आणि शिक्षणासाठी झटणारे खरे लोकराजेही होते. त्यांनी आपल्या काळात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अनिष्ट रूढी-परंपरांना आव्हान देत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांची विचारधारा आजही समाजासाठी दिशादर्शक असून ती पुढील पिढ्यांनीही जपली पाहिजे.”


 

‘वीर धुरंधर योध्यांचा जागर शिवशंभो गर्जना’ आणि करिअर मार्गदर्शन

 

पहिल्या दिवसाची सांगता “वीर धुरंधर योध्यांचा जागर शिवशंभो गर्जना” या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात अभिजित जाधव व आमु जाधव यांनी रणवाद्यांवर आधारित क्रांतिकारक गीते सादर केली. अत्याधुनिक वाद्यांच्या जुगलबंदीवर त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून, महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा आणि जीवनप्रवासाचा जागर केला. यावेळी त्यांनी “साथीला माती तांबडी, शाहू महाराज मूर्ती रागडी”, “वाघ शिवबा जन्मला”, “रायगड किल्ला महाराष्ट्राची शान” अशी स्फूर्तीदायक गीते सादर करून संबळ दिमडी वाद्यांची जुगलबंदी सादर केली. या कार्यक्रमात त्यांना सुनील शिंदे आणि भावेश खानविलकर यांची साथ लाभली.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. महेश निगडे यांनी दहावीप्रमाणे बारावी देखील महत्त्वाचे वर्ष असते, असे सांगितले. बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू होतो आणि कोणता विषय निवडावा हा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी किंवा डॉक्टरेटचे शिक्षण निवडतात. मात्र, सध्या या दोन्ही विषयांमध्ये स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा याव्यतिरिक्त इतर व्यावसायिक शिक्षण घेण्याकडे कल असायला हवा. यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट, डेटा सायन्स, फिल्ममेकिंग, एआय इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंट असे अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे प्रा. निगडे यांनी सांगितले. विद्यार्थी आपल्या आवडीनुसार कोणत्याही विषयात प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय, व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर परदेशात नोकरी करण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना परकीय भाषा (जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी) शिकायची असल्यास, विद्यापीठांमध्ये किंवा इतर महाविद्यालयांमध्ये त्या शिकविल्या जातात, असेही त्यांनी नमूद केले. परकीय भाषा येत असतील तर परदेशात नोकरी करण्याची उत्तम संधी मिळू शकते, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment