हत्तीण परत मिळण्यासाठी जैन बांधवांकडून निगडीत निदर्शने
अंबानीच्या ‘वनतारा’ विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये तीव्र रोष
निगडी (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातून ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ या हत्तीणीला अंबानींच्या ‘वनतारा’ (Vantara) या खासगी जंगलात नेल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमधील जैन समाजाने निगडी येथे तीव्र निदर्शने केली. भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला मंडळ, वीरसेवा दल निगडी, शांतिसागर पाठशाला आदी संस्थांचे असंख्य श्रावक, श्राविका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३५ वर्षांची ‘माधुरी’ आणि ७०० वर्षांची परंपरा
मागील आठवड्यात नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) जैन बांधवांची लाडकी हत्तीण, माधुरी उर्फ महादेवी हिला मठातून गुजरात येथील अंबानींच्या खासगी जंगलात हलवण्यात आले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून माधुरी याच मठात वाढली होती. विशेष म्हणजे, या मठाची ७०० वर्षांपासून हत्ती किंवा हत्तीण सांभाळण्याची जुनी परंपरा आहे.
परंतु, धनदांडग्यांच्या हट्टापायी ‘पेटा’ (PETA) सारख्या संस्थेचा गैरवापर करून, माधुरीची देखभाल व्यवस्थित होत नाही असे कारण देत तिला गुजरातमधील अंबानींच्या वनतारा येथे नेण्यात आल्याचा आरोप पशु प्रेमींनी केला आहे. या कृत्यामुळे नांदणीसह संपूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोकभावनांचा कोणताही विचार न करता केलेल्या या कृतीचा निषेध म्हणून प्रत्येक गावाने सरकारकडे निषेद पत्रक व ठराव पाठवले आहेत.
अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार
या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमधील जैन समाज अत्यंत दुःखी झाला आहे. या दुष्कृत्याचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवडमधील जैन महिला मंडळानेही अंबानींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. हत्तीणीला त्वरित मठात परत आणून सोडावे, अशी घोषणा देत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलकांनी अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली. यात रिलायन्स जिओ सिमकार्ड दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करण्याचा, तसेच रिलायन्स मार्ट, शॉपिंग मॉल, रिलायन्स फ्रेश आणि रिलायन्स फायबर या उत्पादनांचा त्याग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आम्ही शासनाकडे गांभीर्याने दखल घेण्याची विनंती करतो
एका मुक्या प्राण्याला मठातून नेत असताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून केवळ नागरिकच नव्हे तर संपूर्ण परिसर आणि निसर्ग देखील हळहळला होता, असे आंदोलकांनी सांगितले. मठातून ही हत्तीण नेणे म्हणजे एक साधी गोष्ट नसून, धनांच्या जोरावर नांदणी मठाच्या परंपरेला तडा देण्याचे हे काम असल्याचा आरोप पशु प्रेमींनी केला. “आमची लाडकी हत्तीण माधुरीला लवकरात लवकर आमच्या मठाच्या स्वाधीन करावे, अशी विनंती आम्ही शासनाकडे देखील करत असून याची गांभीर्याने दखल घ्यावी,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
