पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्याची सुनावणी लालफितीत: ५० हजार हरकती दाखल असूनही प्रक्रिया ठप्प!
नागरिकांचा संताप शिगेला; विधानसभेत मुद्दा उपस्थित होऊनही समितीची स्थापना नाही
२१ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यावर तब्बल ५० हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या असतानाही, यावर सुनावणी सुरू होण्याला ‘लालफितीचा’ अडसर येत आहे. हरकती दाखल करण्याची मुदत संपून महिना उलटला, तरी शासन आणि महापालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी शासनाची चार सदस्यीय समिती आणि त्यात महापालिका आयुक्तांचा समावेश असलेली एकूण पाच सदस्यीय समिती स्थापन होणे अपेक्षित होते. मात्र, आजतागायत ही समितीच अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करणे शक्य झाले नाही आणि संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आहे.
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या आंदोलनानंतरही विलंब
आराखड्यात झालेल्या चुका, दुबार आरक्षणे आणि अन्यायकारक तरतुदींविरोधात शहरात मोर्चे, धरणे आणि उपोषण यांसारखी अनेक आंदोलने झाली आहेत. या आराखड्याला विरोध दर्शवत सत्ताधारी आमदारांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा ‘डीपी’ रद्द करण्याची मागणी केली होती. एवढं होऊनही सुनावणी प्रक्रियेचा मुहूर्त निघत नसल्याने नागरिकांमधील संभ्रम आणि संताप अधिकच वाढला आहे.
या विलंबामुळे महापालिका प्रशासनासमोरही अनेक अडचणी उभ्या आहेत. तब्बल ५० हजार नागरिकांना सुनावणीसाठी पत्र पाठवावे लागणार असून, अनेक हरकतींमध्ये अपूर्ण पत्ते व मोबाईल क्रमांक असल्यामुळे संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. यामुळे सुनावणी आणखी पुढे ढकलली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हा विलंब शासनाच्या निष्काळजीपणामुळे आहे की जाणूनबुजून केला जातोय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
