पर्यावरणाचे रक्षण करणारे विकास प्रकल्प सादर करा: वास्तुविशारदांना ‘जलदिंडी’चे आवाहन
एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे गुणगौरव सोहळा संपन्न; प्राध्यापक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
२२ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, पुणे, पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे – ‘जलदिंडी’ या नदी सुधार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संचालक राजीव भावसार यांनी, वाढत्या शहरीकरणामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वास्तुविशारदांनी सर्वसमावेशक विकास प्रकल्प सादर करावेत असे आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
भावसार म्हणाले की, पवना नदीचा उगम शोधताना हे लक्षात आले की शहरी भागात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आर्किटेक्ट्सची भूमिका महत्त्वाची ठरेल.
यावेळी प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट प्रतीक देशमुख यांनीही कठोर परिश्रम आणि सातत्यातूनच यश मिळते, असे सांगितले. ते म्हणाले, “वाढत्या शहरीकरणात आता परवडणारी पर्यावरणपूरक घरे आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त नागरी सेवा-सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी वास्तुविशारदांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
या सोहळ्यात महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ऐश्वर्या गराडे (प्रथम), संयुजा पारवे (द्वितीय) आणि ऐश्वर्या नायर (तृतीय) यांचा गौरव करण्यात आला.
याव्यतिरिक्त, नाशिक महानगरपालिका, पीडीए आर्किटेक्ट फॉर्म पुणे आणि आयआयटी कानपूर येथे झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या कृतिका कदम, इशिका नारखेडे, भाग्यश्री चौधरी, वेदांत गरुड, दिशा प्रधान, आदित्य बरगे यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि यशस्वी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
