विकसित भारतासाठी नव तंत्रज्ञान उपयुक्त: डॉ. सुरेश गोसावी
पीसीसीओईआर येथे पाचव्या ‘एशियाकॉन-२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; १६ देशांतील २५६ शोधनिबंधांचे सादरीकरण
२५ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे – भारतात ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. यामुळेच देश प्रगतीपथावर वाटचाल करत असून, नव तंत्रज्ञान विकसित भारतासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.
ते पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे आयोजित पाचव्या ‘एशियाकॉन-२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या परिषदेचे आयोजन पीसीसीओईआर आणि आयईईई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
जागतिक स्तरावर संशोधकांना व्यासपीठ
या आंतरराष्ट्रीय परिषदेला सोळा देशांमधून आलेल्या २ हजार २६२ प्रवेशिकांमधून एकूण २५६ शोधनिबंध सादरीकरणासाठी निवडले गेले, असे प्रास्ताविकेत डॉ. राहुल मापारी यांनी सांगितले. ही परिषद संशोधकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती मिळते, नवकल्पनांची देवाणघेवाण होते आणि पुढील वाटचालीस योग्य दिशा मिळते, असे मत सावी इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या पाच वर्षांपासून पीसीईटीच्या सहयोगाने अशा आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन होत असल्याचा आनंद वाटत असल्याचे आयईईईचे डॉ. शशिकांत पाटील यांनी नमूद केले.
तंत्रज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी
या परिषदेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश स्पष्ट करताना पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरिश तिवारी म्हणाले की, तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा, या दृष्टीने चर्चा आणि संशोधनाला चालना देणे महत्त्वाचे आहे.
या कार्यक्रमात ‘एशियाकॉन’ परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेमध्ये विविध विद्याशाखांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पीसीईटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करून परिषदेला शुभेच्छा दिल्या.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
