‘मुर्तिजापूर नगरपरिषदेला वाली कोण?’
मुख्य अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे आणि मनमानी कारभारामुळे शहरातील विकासकामांचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप
२८ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुर्तिजापूर, प्रतिनिधी : विलास सावळे – अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहरातील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून, येथील नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने शहरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषद केवळ नावापुरतीच उरली असून, ती अक्षरशः ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा अड्डा बनल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

प्रशासकीय कामांचा खोळंबा
गेल्या अनेक महिन्यांपासून मुर्तिजापूर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात कारभार असल्याने शहराच्या विकासाची कामे, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहिल्याने विकासकामांचा वेग मंदावला आहे. जन्म-मृत्यू दाखले, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी अशा कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास वाट पाहावी लागते.

नागरिकांची मागणी, राजकीय दबाव असल्याची चर्चा
या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला आहे. काही स्थानिक नेत्यांनी तर अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कायमस्वरूपी मुख्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय दबाव असल्याचीही कुजबूज सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. मुर्तिजापूर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी आणि कार्यक्षम मुख्य अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यासच शहरातील प्रशासकीय व्यवस्था सुरळीत होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
