दारूमुळे होणारी कुटुंबांची वाताहत थांबणार: मेळघाटातील बासपाणी गावाने केली ‘दारूबंदी’ची घोषणा!
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक निर्णय; दारू आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा गावकऱ्यांचा संकल्प.
धारणी, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
धारणी शहराला लागून असलेल्या बासपाणी गावाने दारूच्या दुष्परिणामांना कायमचा ‘रामराम’ करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गावात दारूमुळे अनेक कुटुंब बर्बाद झाल्याचे विदारक वास्तव पाहता, नागरिकांनी एकत्र येऊन गाव पूर्णपणे दारूबंदी करण्याची घोषणा केली.
मेळघाट जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी () अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा निर्णय केवळ दारूबंदीपुरता मर्यादित नसून, बासपाणी गावाला व्यसनमुक्त बनवण्याचा गावकऱ्यांचा सामूहिक संकल्प आहे.
गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, दारूमुळे निर्माण होणारे सामाजिक व कौटुंबिक प्रश्न आता गंभीर बनले आहेत. दारूमुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली असून, ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी दारूबंदी करणे अत्यंत आवश्यक झाले होते.
कठोर दंडात्मक कारवाईचा निर्णय:
गावातील नागरिकांनी यावेळी एक अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. यापुढे जो कोणी दारू पिऊन आढळेल अथवा कोणाच्या घरी दारू आढळल्यास, त्यावर विशेष दंडात्मक कार्यवाही करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे.

जिल्हा अध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी बासपाणी येथील दारूबंदीचा निर्णय लोकहिताचा आणि अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले.
भिलावेकर म्हणाले, “मी आमदार असताना मेळघाटातील अनेक गावांमध्ये दारूबंदी करण्यात आली होती. आता जी गावे दारूबंदीपासून वंचित आहेत, त्या सर्व गावांनी तत्काळ आपल्या गावात दारूबंदीचा निर्णय घेऊन सामाजिक क्रांती घडवावी,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्राम पंचायत सरपंच, पोलीस पाटील, आळा पटेल, भाजपाचे नेते साबुलाल जी पाटणकर, येणोरकर सर यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
