महात्मा फुले यांनी समाजाला दाखवला शिक्षणातून प्रगतीचा मार्ग; देशातील शिक्षण ‘विज्ञानवादी, विवेकवादी’ असावे – डॉ. सुखदेव थोरात
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रबोधन कार्यक्रम; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेतून विचारांचे जागरण
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३० नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी ‘महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती’ या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

डॉ. सुखदेव थोरात म्हणाले की, समाजात प्रत्येकाला समान वागणूक आणि समान शिक्षण मिळावे, या विचारांवर महात्मा जोतीराव फुले यांनी आपले आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या याच विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधी आणि समान शिक्षणाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये मांडला.
डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले की, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन आणि जॉन स्टुअर्ट मिल यांच्या मानवी हक्कांच्या विचारांचा पगडा होता. याच मार्गावर चालत महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांतीची सुरुवात करत आयुष्यभर मानवी हक्कांसाठी लढा दिला.

महात्मा फुले यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक समता निर्माण करणे, सर्वांना समान संधी आणि विशेषतः स्त्री शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य केले. स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले आणि त्यांना देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका बनवले. शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी त्यांनी शाळा काढल्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले.
डॉ. थोरात यांनी यावर भर दिला की, महाराष्ट्राला संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांच्यापासून मोठी संत परंपरा लाभली आहे. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी संत साहित्यातून प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी तोच वारसा पुढे चालवला.
डॉ. सुखदेव थोरात यांनी देशातील शिक्षण कशा प्रकारचे असावे यावर आपले स्पष्ट मत मांडले:
-
देशातील शिक्षण विवेकवादी, तर्कवादी, विज्ञानवादी आणि नैतिक असावे.
-
शिक्षणाचा मुख्य उद्देश व्यक्तिमत्व घडविणारा असावा.
-
शिक्षण अनुभवाने मिळणारे असावे.
या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात शिरीष पवार, प्रवीण ढोणे, आबासाहेब आठखिळे, विक्रांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जागर क्रांतिसूर्याचा’ हा कार्यक्रम सादर केला. यामध्ये महात्मा फुले यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु-शिष्यांच्या कार्याचा गौरव गीतांमधून करण्यात आला. ‘कष्ट केले माझ्या भीमाने’, ‘काळाराम मंदिर चवदार तळे’, ‘सांग सांग जोतीबा कसे फेडू तुझे पांग’, ‘पेटती मशाल’, ‘आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले’, ‘२ वर्ष ११ महिने १८ दिवस लिहलं संविधान’, ‘रथ समतेचा’, आणि ‘स्त्री मुक्तीला जन्म दिला’ यांसारखी समतेचा संदेश देणारी गाणी सादर करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी विक्रांत शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत मंचावर प्रवेश करत डॉ. बाबासाहेबांचे विचार समजावून सांगितले. यावेळी उपस्थित नागरिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सत्रात सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे यांनी महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारी गीते सादर केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
