सावित्रीबाईंचे विचार समाजात रुजणे ही काळाची गरज; न्यायाधीश नीना बेदरकर यांचे प्रतिपादन
सातारा/लिंब,२४ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
सातारा/लिंब : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अखिल स्त्री जातीच्या उद्धारासाठी असून, आज स्त्रिया जे मुक्तपणे जीवन जगत आहेत, त्यामागे सावित्रीबाईंचे मोठे योगदान आहे. त्यांचे विचार समाजात रुजणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नीना बेदरकर यांनी केले. लिंब (ता. सातारा) येथे आयोजित जयंती उत्सवात त्या बोलत होत्या.
क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान आणि मनस्विनी विश्वपीठ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
१ जानेवारी: भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ६१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.
-
२ जानेवारी: महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला असून विजेत्यांना बक्षिसांची लयलूट करण्यात आली.
-
३ जानेवारी: सकाळी सावित्री आईंच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फुले दांपत्याची वेशभूषा केली होती, तर शिरूर येथील विद्यार्थिनींच्या लेझिम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राज्यस्तरीय निबंध आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. भाग्यश्री शिंदे, साक्षी जाधव, अनुष्का सपकाळ, श्रुती चव्हाण (निबंध) आणि श्रुतिका सावंत, शिवांजली नेवसे, ओवी कुलकर्णी, अर्णव शिंदे, शार्दुल हरवणे (हस्ताक्षर) यांना न्यायाधीश बेदरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या कर्णे (ISS, UPSC), ॲड. राजश्री सावंत, तेजस सावंत (MPSC Class 1), साक्षी शिंदे (डॉक्टर), गीतांजली वर्णेकर(सहा.लेखाधिकारी, महापारेषण), ॲड.अनिकेत शिंदे, अनिकेत सावंत (सहायक अभियंता, कृष्णा खोरे), ॲड.श्वेता शिंदे, ॲड.मिताली शिंदे आणि विक्रांत सावंत(कनिष्ठ लिपीक, जिल्हा न्यायालय) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी न्यायाधीश बेदरकर यांनी उपस्थितांना ‘बालविवाहमुक्त सातारा जिल्हा’ करण्याची शपथ दिली.
व्याख्याते अमर हजारे यांनी ‘समाजव्यवस्थेच्या सुसंस्कृत विकासासाठी स्त्री शिक्षण गरजेचे’ असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे स्वागत ॲड. विद्या शिंदे व हणमंत शिंदे यांनी केले. गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर आकाश शिंदे आणि जयप्रकाश शिंदे यांनी आभार मानले.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी ओम जगताप, सचिन शिंदे, धीरज शिंदे, श्रीकांत जगताप, चेतन शिंदे, समाधान जगताप, नाना जगताप, रोहित शिंदे, दीपक वर्णेकर, निलेश शिंदे, मोहित वर्णेकर, रोहन शिंदे, सौरभ पवार ,लखन शिंदे, रवी शिंदे, शुभम वर्णेकर, आकाश शिंदे ,सागर ससाणे , आदित्य शिंदे यांच्यासह महात्मा फुले प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



