रहाटणी, तापकीर नगरचा पाणी प्रश्न सुटणार! नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश; अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ३० जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड : रहाटणी आणि तापकीर नगर प्रभागातील नागरिकांना मागील सहा महिन्यांपासून भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर तोडगा निघणार आहे. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन ताठर भूमिका घेतल्याने प्रशासनाने दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे.
रहाटणी परिसरात मागील काही महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा, अत्यंत कमी दाबाने येणारे पाणी आणि काही गल्ल्यांमध्ये पाणीच न पोहोचणे अशा तक्रारींनी नागरिक त्रस्त होते. वारंवार तक्रारी करूनही तोडगा निघत नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप होता. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी थेट पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले.
त्रिभुवन यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उपअभियंता हृषीकेश गेंगजे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे आणि संबंधित कर्मचाऱ्यांची सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत प्रभागातील प्रत्येक गल्लीचा आढावा घेण्यात आला. “नागरिकांना त्यांचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, यात कोणतीही टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही,” असा ठाम इशारा यावेळी त्रिभुवन यांनी दिला.
बैठकीनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत वाल्व तपासणी आणि पाईपलाईन दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून:
-
शिवराज नगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
-
शास्त्रीनगर, नखाते वस्ती, बळीराज कॉलनी, सिंहगड कॉलनी, राजगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी आणि गावठाण परिसरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि ‘ऑन द स्पॉट’ निर्णयामुळे रहाटणीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा पूर्णपणे नियमित होईपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

