विधवा महिलेच्या शेतावर दबंगांची ‘पाणी’गिरी! स्वमालकीच्या बोअरवेलवर शेजाऱ्यांचा ताबा; जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ
मूर्तिजापूर (अकोला), प्रतिनिधी विलास सावळे, ७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तिजापूर (अकोला) : तालुक्यातील कंझरा शिवारात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय विधवा महिला शेतकऱ्याच्या मालकीच्या बोअरवेलवर शेजारील शेतकऱ्यांनी जबरदस्तीने कब्जा मिळवला असून, पाणी मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या दबंगगिरीमुळे पीडित महिलेचे उभे पीक वाळून जात असून त्या सध्या दहशतीच्या छायेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता तुळशीदास वाशिमकर (वय ५०, रा. कंझरा) यांची मौजे कंझरा शिवारात गट नं. १३९ मध्ये ४ एकर ७ गुंठे जमीन आहे. त्यांच्या पतीने सहा वर्षांपूर्वी स्वखर्चाने या शेतात बोअरवेल खोदली होती. मात्र, लगतच्या गट नं. १४० चे मालक कुंदाबाई बबनराव देशमुख, बबनराव पुंडलीकराव देशमुख आणि जयेश बबनराव देशमुख यांनी सविता यांना कोणतीही विचारणा न करता, त्यांच्या बोअरवर स्वतःची पाणी खेचण्याची मशीन टाकली आहे.
सविता यांनी आपली मशीन काढून घेण्याची विनंती केली असता, संबंधितांनी त्यांना सहकार्य करण्याऐवजी उलट धमकावले. “तुझ्याकडून जे होते ते करून घे, आमचे कोणीच काही करू शकत नाही,” अशा शब्दांत त्यांना अपमानित करण्यात आले. एकटी विधवा महिला पाहून त्यांना मानसिक त्रास दिला जात असून, थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
स्वतःच्या हक्काचे पाणी असूनही ते वापरू दिले जात नसल्याने शेतातील उभी पिके पाण्यावाचून वाळून जात आहेत. यामुळे सविता वाशिमकर यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. “मी भीतीपोटी शेतात जायलाही घाबरत आहे, मला न्याय मिळावा,” अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला मारली आहे.
शेतकरी महिला आधीच पतीच्या निधनानंतर संघर्षात असताना, अशा प्रकारे शेजाऱ्यांकडून होणारी पीडवणूक दुर्दैवी आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने तात्काळ दखल घेऊन, सदर बोअरवेलवरील अतिक्रमण हटवावे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
